पुणे -लॉकडाऊन काळात उद्योग आणि दळण वळणावर घातलेल्या निर्बंधामुळे देशातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली असून, गेल्या चार दशकांत प्रथमच एवढी घट झाली असल्याची नोंद अभ्यासकांकडून करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत 100 मिलियन टनपेक्षा अधिक असलेले भारतातील कार्बन उत्सर्जन मार्च ते एप्रिलदरम्यान 30 मिलियन टन इतके कमी असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
“सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ऍन्ड क्लीन एअर’ या संस्थेतर्फे भारतात मार्च आणि एप्रिल या काळातील कोळसा, विजेच्या मागणीतील बदल, वाहतूक, जैविक इंधनाचा वापर अशा विविध विषयांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावर आधारित अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार, जागतिक स्तराचा विचार करता मार्च ते एप्रिल या काळात भारतील कार्बन उत्सर्जन हे 30 टक्क्यांनी कमी झाले असून, गेल्या चार दशकांत प्रथमच एवढी घट झाली असल्याची नोंद अभ्यासकांकडून करण्यात आली. यामुळे जागतिक कार्बन उत्सर्जनावर नकीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
उद्योग आणि दळणवळनामुळे कार्बन उत्सर्जन आणि हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. लॉकडाऊन काळात हे दोन्ही घटक बंद असल्याने त्याचे विलक्षण परिणाम दिसून आले. त्यामुळेच आगामी काळात पर्यावरणविषयक धोरणांसाठी या गोष्टींबाबत सविस्तर विचार करणे, गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून नोंदवले आहे.