केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत लॉकडाऊनचा मोठा फटका बसल्यानंतर लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असतानाच आता पुण्यात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरांमधील व्यवहार आता पुन्हा दहा दिवसांसाठी विस्कळीत होणार आहेत. बसत आलेली घडी पुन्हा विस्कटणार आहे.
पहिल्या फटक्यातून लोक अजून सावरलेले नसतानाच त्यांना पुन्हा तशाच स्वरूपाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असेल, तर लोकांनी आपले संसार सावरायचे कसे, हा त्यांच्यापुढील मुख्य प्रश्न असणार आहे. त्यामुळे पुण्यात पुकारण्यात आलेल्या या निर्बंधांना अनेकांनी जाहीर विरोध केला आहे. व्यापाऱ्यांच्या संघटनांनीही हा विरोध स्पष्टपणे नोंदवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिगत पुढाकाराने हा लॉकडाऊन केला जात आहे, असेही चित्र निर्माण झाले आहे.
पालकमंत्री या नात्याने त्यांच्यावर या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यात त्यांचा हेतू योग्य असला तरी हा निर्णय अवाजवी धाडसाचा आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. मध्यंतरी पुण्यात करोना रुग्णांचे प्रमाण बरेच वाढले. दिवसाला हजाराच्यावर रुग्ण नोंदवले जाऊ लागल्यानंतर पुण्याबाबत हा निर्णय झाला आहे. करोना विषाणूची साखळी तोडण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असे सांगितले गेले आहे.
तथापि, तो उपाय कितपत परिणामकारक ठरेल याचीही शंका आहे. आज जगभर सगळीकडे अनलॉकिंगचा मूड आहे. ज्या अमेरिकेत जवळपास 30 लाख करोनाग्रस्त सापडले असताना आणि अजून तेथे ही साथ जराही आटोक्यात आली नसताना तिथे सर्वच व्यवहार खुले केले जात आहेत. पण पुण्यावर पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे, हे दुर्दैवी आहे. लोक बेशिस्त आहेत, त्यांना कसलीच फिकीर दिसत नाही, अशा दहा टक्के बेशिस्तांचा फटका 90 टक्के पुणेकरांना सोसावा लागतो अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत.
त्यातून लॉकडाऊनच्या विरोधातला नागरिकांचा असंतोष स्पष्टपणे दिसून येतो आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर अनेक क्षेत्रांतील व्यवहार पूर्ववत होऊ लागले होते. दुकानदार, छोटे व्यावसायिक, पथारीवाले, फेरीवाले यांचा जरा जम बसू लागला होता, बिघडलेले अर्थचक्र सावरू लागले होते. पण या सर्वांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन दहा दिवसांचाच आहे, असे सांगितले गेले असले तरी तो पुन्हा वाढवला जाणार नाही याची काहीच खात्री नाही. जर तो त्यानंतरही वाढवला गेला तर मात्र कोणाचेच काही खरे नाही.
लॉकडाऊन अचानक जाहीर केल्यामुळे लोकांचे हाल होतात, असा आधीचा अनुभव जमेला धरून यावेळचा लॉकडाऊन मात्र लोकांना चार दिवस आधीच कल्पना देऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे लोकांना दहा दिवसांच्या अवधीतील आपली तजवीज करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. मात्र, यानिमित्ताने चार दिवसांत बाजारात जी गर्दी झालेली दिसली त्यातून उद्भवणाऱ्या धोक्याचा विचार कोणत्याच पातळीवर झाला नाही. जी साखळी तोडण्यासाठी म्हणून हा लॉकडाऊन केला जाणार आहे त्याच्या आधीच अनेक ठिकाणी झालेल्या प्रचंड गर्दीने लॉकडाऊनच्या अपेक्षित परिणामांना फाटा दिला गेला.
या गर्दीतून किती जणांना संसर्ग झाला असेल याचा अजून अंदाज आलेला नाही. करोना प्रसार रोखण्यासाठी, गर्दी टाळणे हा मुख्य उपाय असतो, पण लॉकडाऊनच्या धास्तीने लोकांनी बाजारपेठांमध्ये नको इतकी गर्दी केलेली दिसली. दारूबाजांनी वाईन शॉप समोर पुन्हा एकदा भल्या मोठ्या रांगा लावल्या. घरातल्या ज्येष्ठांची अधिक सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी लोकांची धावाधाव झाली. त्यासाठी खासगी वाहनांची मदत घेण्याचा आटापिटा त्यांना करावा लागला.
दुकानात भरलेल्या नाशवंत मालाची विल्हेवाट लावण्यासाठी दुकानदारांनाही मोठेच कष्ट घ्यावे लागले. या दहा दिवसांतील पहिले पाच दिवस म्हणे कडक निर्बंधांचे असणार आहेत. आपल्या अत्यावश्यक कामासाठी ज्यांना रस्त्यावरून ये-जा करणे अनिवार्य आहे त्यांना पुन्हा पोलीस पासेसची कटकट करावी लागणार आहे. एकुणातच पुन्हा लागू करण्यात आलेला हा लॉकडाऊन लोकांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरला आहे. वास्तविक करोनाच्या संबंधातील लोकांच्या मनातील धास्ती अलीकडच्या काळात काही प्रमाणात मावळत चाललेली होती.
कारण अनेकांच्या परिचयाचे लोक करोनातून पूर्ण बरे होऊन घरी परत आलेले अनेकांनी अनुभवले असल्याने लोकांना आता करोनाची धास्ती वाटेनाशी झाली होती. करोना झाला म्हणजे माणूस मरतोच, असे नव्हे याची खात्री लोकांना पटल्यामुळे लोक मानसिकदृष्ट्या बऱ्यापैकी प्रबल होत चालले असल्याचा सार्वत्रिक अनुभव असताना या लॉकडाऊनमुळे समाजात पुन्हा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे, हेही मान्यच करावे लागते.
प्रशासनाने पुणे शहरात प्रत्यक्ष लॉकडाऊनच्या तारखेच्या आधीच अनेक ठिकाणचे मार्ग पत्रे ठोकून बंद करायला सुरुवात केल्याने लोक अधिकच धास्तावलेले दिसले. जगातल्या अनेक तज्ज्ञांचे मत हे लॉकडाऊनला अनुकूल नाही. अगदीच निरूपाय असेल तर हा मार्ग अवलंबावा, अन्यथा ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस आढळून येतात तेवढाच भाग सील करून करोना प्रसार रोखण्याचा उपाय सर्वोत्तम आहे, असा अनेकांचा कल आहे. पुण्यात सूक्ष्म बाधित क्षेत्रातच कडक निर्बंधांचे धोरण मध्यंतरी अवलंबले गेले होते. त्याचाही चांगला परिणाम दिसून येऊ लागला होता. सरसकट सर्वांनाच वेठीला धरण्यापेक्षा आता अशाच वेगळ्या उपायांनी करोनाला नियंत्रणात आणायला हवे. तथापि, सरकारी प्रशासनाने आता ऐवीतेवी पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारलाच आहे तर त्याला आता मनापासून साथ देण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागेल.
विरोध आणि नाराजी असली तरी नागरिक त्यासाठी सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. यावेळच्या लॉकडाऊनच्या संबंधातील निर्देश पुरेसे स्पष्ट आहेत. त्यातील उपाययोजनांविषयी कोणतीही संदिग्धता ठेवली गेलेली नाही हे चांगले झाले. काय चालू आणि काय बंद राहणार आणि पाच दिवसांनंतर नेमक्या किती कालावधीसाठी दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू ठेवायचे याचीही स्पष्ट माहिती प्रशासनाने वेळीच दिली आहे. त्यामुळे लोकांना त्यानुसार नियोजन करणे सोपे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी पूर्वीप्रमाणेच सहकार्य करून हा अल्पावधीतील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.