पुणे : राज्यात करोना रुग्णांचा आलेख वाढतच जात असल्याचे दिसत आहे. रोज रुग्णसंख्येत भरच पडताना दिसत असून मागील २४ तासांत देखील राज्यात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक नोंद करण्यात आली आहे.आया पार्श्वभूमीवर रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी करोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.
राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर राजेश टोपे म्हणाले की, देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर आणि नर्सची आवश्यकता आहे. तिथे स्टाफ तातडीने भरून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. राज्यात ४५ लाख लसीकरण झालं आहे. सध्या जे निर्बंध लागू आहेत त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
“सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबतच्या नियमांचं पालन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सध्या लवकरात लवकर लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आम्ही राज्यात दररोज जवळपास ३ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत. या हिशोबानं आम्ही एका आठवड्यात २०-२१ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
टोपे म्हणाले की, राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागलं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र लॉकडाऊनसंदर्भात गंभीर चर्चा होईल. त्यानंतरच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.