मुंबई – राज्यात करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोनाबाधितांची संख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, हे अवलंबून असेल. आमची प्राथमिकता आरोग्य आणि सुरक्षा असणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, लॉकडाऊन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल, असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. या मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केले.
राज्याला जास्तीत जास्त करोना प्रतिबंधक लस मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल, तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
तिसऱ्या लाटेसाठी करण्यात येणाऱ्या तयारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, करोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री याविषयी सतत चर्चा करत आहेत.
या परिस्थितीला सामोरे कशा पद्दतीने जायचे याकडे आमचे लक्ष आहे. यासाठी टास्क फोर्स मार्गदर्शन करत आहे. कुठे याचा फटका बसण्याची शक्यता आहे, याकडे लक्ष देत आहोत. तसेच कोविडच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय उद्योग सुरु ठेवणे महत्वाचे असून त्याचे नियोजनही महत्वाचा भाग असेल.