नवी दिल्ली – देशातील कोरोना संकटाची सद्यस्थिती पाहता केंद्र सरकारतर्फे आज देशव्यापी लॉक डाऊनला आणखी २ आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली असून देशभरामध्ये येत्या १७ मेपर्यंत लॉक डाऊन लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या या घोषणेद्वारे लॉक डाऊनचा तिसरा टप्पा ४ मेपासून १७ मेपर्यंत लागू करण्यात येईल.
विशेष म्हणजे देशभरात लागू करण्यात आलेल्या गेल्या २ लॉक डाऊनबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली होती. यावेळी मात्र सरकारच्या गृहमंत्रालयाद्वारे लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, आजच गृहमंत्रालयाने परराज्यात अडकून पडलेल्या विद्यार्थी, कामगार, यात्रेकरूंना दिलासा देत त्यांच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे आदेश दिले होते.
सरकारने देशव्यापी लॉक डाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढवली असली तरी या कालावधीमध्ये परराज्यातून आपल्या राज्याकडे प्रवास करू इच्छिणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यातील इतर शहरांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून यासाठी त्यांना सरकारी सूचनांचे पालन करावे लागणार आहे. असं असलं तरी देशातील वा राज्यातील रेड झोनमध्ये मोडणाऱ्या कोणत्याही शहरांमध्ये प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.