मुंबई – येत्या 2 एप्रिल रोजी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत अगोदरच देण्यात आले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत चलबिचल सुरू आहे. व्यापारी वर्गही धास्तावला आहे तर मोठ्या उद्योजकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने अन्य उपाय करावेत अशी सूचना काही मंडळींनी केली आहे. त्यावरही सरकारचा विचार सुरू असून अगदीच सगळेच बंद करण्याऐवजी कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
त्यात प्रामुख्याने सिनेमा आणि नाट्यगृहे बंदी ठेवली जाण्याची शक्यता आहे. मॉलही पूर्णपणे बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे. हॉटेल्स खुली ठेवली जातील. मात्र 50 टक्के पेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी दिली जाता कामा नये असे बंधन घातले जाण्याची शक्यता आहे. तेच सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीतही केले जाणार आहे. वाहतूक पूर्ण बंद न करता मर्यादीत प्रवाशांसह त्यांना परवानगी दिली जाणार आहे.
दुकानांमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जातील. यात प्रामुख्याने दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे. दुकांनाबाहेरची गर्दीही कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे सूतोवाच केले गेले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुनश्च हरिओम अंतर्गत काही व्यवहार सुरू करण्यात आले होते. मात्र नंतर नियम गुंडाळून ठेवण्यात आले. धार्मिक कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना सशर्त परवानगी दिली गेली होती. मात्र तिथेही नियमांची पायमल्लीच झाल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांबाबतच्या निर्णयाचाही फेरविचार केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.