मुंबई : देशभरात एकीकडे कोरोनाचा वेग कमी होतोय तर दुसरीकडे राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामागचं कारण आता समोर आले आहे. याविषीयीचा अहवाल समोर आला आहे. केंद्र सरकारच्या पथकाने राज्यात पाहणी केली आहे. या केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोनाविषयीचा लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असे केंद्रीय पथकाने सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात म्हटले आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केला.
कोरोना रुग्णसंख्य झपाट्याने वाढत असताना त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यावा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावे असेही केंद्रीय पथकाने सुचवले आहे.
7 मार्च रोजी महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 97,983 झाली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 22,19,727 पर्यंत वाढली आहेत. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबई शहरात काल एका दिवसात 1361 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतीली कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता 3,35,569 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 11504 झाली आहे.