- देहू संस्थान वादाच्या भोवऱ्यात
- नागरिकांमधून तीव्र संताप
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात स्थानिक आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना देहू संस्थानने निमंत्रणच दिले नसल्याची बाब समोर आली आहे. देहू संस्थानच्या या कृतीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, देहू संस्थानकडून धार्मिक कार्यक्रमात राजकारण केले जात असल्याचा आरोप उघडपणे होऊ लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमानिमित्त मंगळवारी (दि.14) प्रथमच देहूत आले होते. त्यांच्या या दौऱ्याबद्दल नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यामुळेच या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजशिष्टाचारानुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मारुती महाराज कुऱ्हेकर यांचा समावेश होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांचा उपस्थितांमध्ये समावेश नव्हता. या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती खटकणारी होती.
याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देहू संस्थानच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मावळ लोकसभा मतदार संघात धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील, तर स्थानिक खासदार म्हणून देहू संस्थानने मला निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, देहू संस्थानने धार्मिक कार्यक्रमात रजकारण करत, मला निमंत्रण दिले नाही. संस्थान पदाधिकाऱ्यांची ही कृती योग्य नाही.
दरम्यान, याच बाबतीत मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील संस्थानकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचे स्षष्ट केले. अशा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना डावलणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमात बोलू दिले नाही. त्यामुळे आता संस्थानच्या कृतीबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.