ग्रामपंचायतीचा फड जिंकण्यासाठी गावकारभाऱ्यांकडून व्यूहरचना
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता कलाटणी मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकमेंकाविरोधात एकवटून लढणाऱ्या राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना या पक्षांतील नेत्यांना सहा महिन्यांत होऊ घातलेल्या 750 ग्रामपंचायत निवडणुकांत स्थानिक नेत्यांना सबुरीचे धोरण घ्यावे लागणार आहे. सहा महिन्यांत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेल्यामुळे स्थानिक नेत्यांना मनोमिलनाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी स्थानिक नेते आपआपल्या मंत्री, आमदारांकडे आग्रही आहेत.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभावक्षेत्र आहे. त्यात गेल्या वीस वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने राष्ट्रवादीला चांगलीच टक्कर दिली आहे. विधानसभेला याचा प्रत्यय आला आहे. गावपातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. गावपातळीवर प्रत्येक पक्षांचे नेते सक्रिय असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, इंदापूर, बारामती, मावळ, जुन्नर या तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या तालुक्यात निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत.
श्रेयवादाचे राजकारण उफाळणार
राज्यात महा विकास आघाडी सत्तेवर आली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीला अजून सहा महिने अवकाश आहे. त्यापूर्वी गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच मंजूर करण्यासाठी गावकारभाऱ्यांसाठी नवनिर्वाचित मंत्री आणि आमदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. या विकासकामांच्या जोरावर पोषक वातावरण निर्माण होईल, अशी अटकळ स्थानिक नेते बांधत आहेत.