नवी दिल्ली – शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करण्यासाठी अथवा नव्याने विनासायास कर्ज घेण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेनं एक नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव शेती कर्जमाफीसाठीची “ऋण समाधान योजना’ असं आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, 20 टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण कर्जमाफी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 ही आहे.
भारतीय स्टेट बॅंकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. यामधे जे लोक दोन वर्षापेक्षा जास्त थकित असतील त्यांच्या मुद्दलावरती फक्त 20 टक्के रक्कम भरून त्यांना कर्जमुक्त होता येते. तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो.
या योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त होईल आणि महापूर किंवा कोविडमुळे झालेल्या नुकसानीवर थोडा तरी आराम मिळेल, अशी आशा आहे.