कात्रज, दि. 1 (प्रतिनिधी) -कात्रज परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणी वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.शुक्रवारी, शनिवार सलग दोन दिवस पाच ते सहा तास वीज खंडित झाली होती. परिसरातील संतोष नगर, वाघजाई नगर, अचलफार्म, खोपडे नगर, भारत नगर, कात्रज गावठाण, आंबेगाव, सुखसागर नगर, गोकुळ नगर व इतर भागांमध्ये वीज खंडित पुरवठ्याची समस्या वारंवार निर्माण होत आहे.
रात्री-अपरात्री देखील वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी सण जवळ येत असतानाच ऐन उत्सवात वीज खंडित होऊ लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कात्रज परिसरामध्ये वीज खंडित होत असल्याने लघुउद्योग, व्यवसाय व घरगुती रोजगार यांच्यावर फार मोठा परिणाम होत आहे. वीज खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा नियोजन विस्कळीत होऊन यातून दैनंदिन जनजीवनच विस्कळीत होत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज, नवीन कामे, कुठे केबल तुटणे कोठे अन्य काही कारणांमुळे वीज खंडित होत असते. यासाठी महावितरणला सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास पूर्व सूचना आणि नियोजन करणे गरजेचे आहे.
आज, जो पुरवठा खंडित झाला तो तळजाई पठार वरील विद्युत विभागाचे काम सुरू असल्याने करण्यात आला होता. पद्मावती महावितरण विभागाच्या अंतर्गत गुलटेकडी व कात्रज फिडर एका पोलवर समांतर आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा सकाळी साडेदहा ते दोन पर्यंत खंडित करण्यात आला होता. – शिवलिंग बोऱ्हे, सहायक अभियंता, कात्रज उपविभाग महावितरण विभाग