राजगुरूनगर (प्रतिनिधी): राजगुरुनगर येथे भिमादीच्या काठावर असलेल्या पौराणिक सिद्धेश्वर मंदिरपरिसर त्रिपुरारी पौर्णिमेच्यानिमित्ताने भाविक भक्तांनी मंगळवारी (दि.१२) सायंकाळी लावलेल्या लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिरपरिसर उजळून निघाला.
दर्शनासाठी सकाळीपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाविक भक्तांनी भगिरथी कुडांवर आणि मंदिर परिसर लक्ष लक्ष पणत्या लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली.
शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भिमानदी काठी पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खडकेश्वर गणेश मंदिर व कार्तीकीस्वामी मंदिर आणि त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पणत्या लावल्याने हा परिसर लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
राजगुरुनगर येथे कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक भक्त येतात. यात महिला भाविंकांनी संख्या मोठी असते. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिकीस्वामींचे दर्शन मंदिरात जाऊन घेता येते. कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने मोरांची पिसे खरेदीसाठी गर्दी झाली होती.
ही मोरपिसे कार्तिकस्वामींच्या पुढे दर्शन घेताना ठेवल्यानंतर ती घरी घेवून जात होते. कार्तिकीला मोरपीस,रुद्राक्ष,कोहळा, तीळ वाहण्याची पंरपरा आहे. मोरपीस घरी नेल्यावर पुजा करुन ते जपुन ठेवले जाते. सकाळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या तर रात्री येथील भगिरथी कूडांतील पाण्यात पणत्या सोडुन पुजन करण्यासाठी मोठी गर्दी होती.
पुणे नाशिक नंतर राजगुरुनगर येथे कार्तिकी स्वामीचे मंदिर असल्याने येथे त्रिपुरारी पौर्णिमेला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. कार्तिकस्वामीचे वर्षातून एकदाच महिला दर्शन घेतात. इतर दिवाशी महिला या मंदिरात जात नाहीत. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या २० ते २५ हजार भाविकांनी येथे हजेरी लावली.