अतिवृष्टीचे 5 कोटी 9 लाख रुपयांचे अनुदान वाटप : तहसीलदारांची माहिती
वाघापूर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले होते. मागील महिन्यात या पिकांचे पंचानामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 5 कोटी 9 लाख 88 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले, असल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
हे अनुदान सध्या छोट्या गावांतील शेतकऱ्यांना प्रथम वितरीत करण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. तर आणखी येणारी रक्कम उर्वरित गावांना वितरीत करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यासाठी किमान 20 ते 22 कोटी रुपये मिळतील, असा अंदाज कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ यांनी व्यक्त केला आहे.
10, 814 शेतकऱ्यांना अनुदान
तालुक्यातील शेतीपिकांसाठी 4 कोटी 74 लाख 88 हजार रुपये तर फळ पिकांसाठी 32 लाख 73 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 4933.22 हेक्टर क्षेत्रातील 10358 शेतकऱ्यांना शेतीपिकांसाठी 4 कोटी 74 लाख 88 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 181.85 हेक्टर क्षेत्रातील 456 शेतकऱ्यांना फळ पिकांसाठी 32 लाख 73 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे तसेच कृषी पर्यवेक्षक प्रविण अडसूळ यांनी सांगितले.