अंगाई खरं तर प्रत्येक बाळाचा हक्क. निद्राराणी येईपर्यंत आईच्या अंगाईने पापण्या जड झाल्या की बाळ आपोआप डोळे मिटतं. अंगाई सुरुवातीला पणजीकडून आजीकडे आजीकडून आईकडे परंपरेने आली आणि एक वेळ अशी आली की बहुतेक सगळ्या अंगाईची जागा मंगेश पाडगावकर यांच्या अत्यंत सुंदर अशा “नीज माझ्या नंदलाला रे शांत हे आभाळ सारे’ या अंगाईने घेतली. बाळांनाही हीच अंगाई आवडायला लागली. लता मंगेशकर यांचे सुंदर स्वर ऐकून अंग शहरातं.
पूर्वी खरंतर दहा माणसांच्या घरात दिवसभर काम करून दमलेल्या आईचे स्वतःचेच डोळे झोपेने जड होत असतील आणि अंगाई गाताना तीही बिचारी झोपून जात असेल. काही ठिकाणी वडिलांना आई व्हावं लागतं. अशा वडिलांची आर्त आवाजातली “आ री आजा निंदीया तु ले चल कही उडनखटोलेमें दूर दूर यहॉंसे दूर’ अंगाई मनाचा ठाव घेते. अशीच आणखी एक अंगाई “आजकल में ढल गया दिन हुआ तमा तु भी सोजा सो गयी रंग भरी शाम’ महंमद रफी यांचा आर्जवी स्वर. शूर राजे शिवाजी महाराज यांच्यासाठी गायली जाणारी अंगाई – गुणी बाळ असा जागसी कारे वाया नीज रे नीज शिवकाळात यात भविष्यात त्यांनी काय करायचे हे सांगितले आहे.
आई अंगाई गात असताना बाळाच्या मनात काय चालत असेल. एका आईने खूप छान सांगितले- “गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही’ या गाण्यातली गोठ्यातली गाय, घरट्यातल्या चिमण्या हे त्यांची मुलगी कल्पनेने डोळ्यासमोर आणायची, किती गोड ना! “बा नीज गडे नीज गडे लडिवाळ नीज नीज माझ्या बाळा’ यात आईने केलेले आर्जव विसरता येत नाही.
एखाद्या बाळाला सख्खी आई नसेल तर त्याची आई म्हणजे देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेला भाळी, असं म्हणते पण अंगाई गाते. रात्रीची नीरव शांतता, चांदण्यांची लुसलुशीत, अंधार. यात बाळाला कदाचित भीती वाटते. त्यामुळे बागुलबुवा येतो पेक्षा चंद्र, चांदण्यांच्या विश्वात बाळाला घेऊन जायचं.
डॉ. नीलम ताटके