अरुण गोखले
भोजन हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. भोजन करण्याच्या विविध पद्धती सध्या जरी समाजात रूढ असल्या (पंगत, टेबल, बुफे इ.) तरी सुद्धा आपल्या संस्कृतीत मात्र पंक्ती भोजनास विशेष प्राधान्य दिलेले आहे.
पंगत म्हणजे एका आडव्या रेघेत अनेक व्यक्तींना एकत्र भोजनास बसविणे. सर्वांनी एकत्र येणे आणि एकत्र बसून भोजनाचा आनंद घेणे हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. लग्न, मुंजी सारखे समारंभ, यात्रा, महाप्रसाद यासारख्या कार्यक्रमांना पंक्ती भोजन घालण्याचाच रिवाज आहे. समता, एकता, सहभाग आणि सहयोग ह्या सर्व गोष्टी लोकांच्यात याव्यात. त्यांच्या मधले नाते संबंध अधिक जवळचे निर्माण व्हावे, हे इथे अभिप्रेत असते.
पूर्वीच्या काळी पंक्ती भोजन मांडताना पुढ्यात ताटासाठी आणि त्यासमोर बसण्यासाठी असे पाट मांडले जायचे. भोजनाचे पान हे त्या समोरच्या पाटावर अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या आदर भावनेने ठेवले जायचे. भोजनपात्र म्हणजेच ताट म्हणून अगदी पूर्वी पत्रावळ, केळीचे पान, धातूची ताटे, सोन्या-चांदीची ताटे असत. त्यात विविध प्रकार येत गेले. आधुनिक काळात तर प्लॅस्टिक डीश, थर्मोकॉलची ताटे ह्यांचा वापर सुरू झालेला आहे.
पंक्तीतल्या ताटांभोवती रांगोळी काढणे, पाण्याचा तांब्या ठेवणे, पंक्तींचे वातावरण सुगंधित करण्यासाठी सुवासिक उदबत्या लावणे. रितसर पाने मांडून त्यावर आमंत्रितांना भोजनास बसण्याची विनवणी करणे. भरलेल्या पानावर तुपाची धार वाढून एखादा श्लोक पदावली म्हणून ईश्वर नामाचा जयजयकार करून मग यजमान त्या सर्व आमंत्रित लोकांना “सावकाश जेवा, पोटभर जेवा, लागेल ते मागून घ्या’ अशी नम्र विनवणी करीत असे आणि मग या पंक्ती भोजनास प्रारंभ होत असे. जर ह्या पंक्ती विप्र भोजनाच्या असतील तर भोजनाप्रारंभी प्रत्येक पानासमोर भोजनदक्षिणाही ठेवण्याचा सांस्कृतिक प्रघात आपल्याकडे रूढ होता आणि काही प्रमाणात तो आजही आहेच.
अशा पंक्ती भोजनाचे अनेक संदर्भ आपल्याला जुन्या धार्मिक पौराणिक ऐतिहासिक साहित्यात वाचायला मिळतात. अशा किती पंक्ती जेवून उठल्या यावरून यजमानाच्या दातृत्वाचा अंदाज बांधला जात असे. घरातील सर्वांची एकत्र पाने मांडणे आणि सर्वांनी एकत्र येऊन भोजन करणे. या एकत्र भोजनाच्या निमित्ताने सुसंवाद साधला जावा हीच अपेक्षा असते. पंक्ती भोजनाची मजा ही काही
औरच असते.