हिमांशू
“ठेविले अनंते तैसेचि राहावे,’ या तुकोबांच्या वचनाचं कालांतरानं म्हणीत रूपांतर झालं. परंतु म्हणी योग्य ठिकाणी, योग्य अर्थानं वापरायच्याच नाहीत, ही आपली खासियत आहे. त्यामुळं “ठेविले अनंते…’ या वचनाचा सर्वाधिक दुरुपयोग कामचुकार आणि आळशी लोकांनी केला.
शिवाय, ऐन समरप्रसंगात हतबलता व्यक्त करून पळ काढण्यासाठी चतुर मंडळींनी हेच वचन वापरलं. वास्तविक तुकोबांना जे सांगायचं आहे, त्याचा अर्क “चित्ती असो द्यावे समाधान’ या शब्दांमध्ये अधिक व्यापकतेनं सामावलाय.
परंतु “समाधान’ हा शब्दही आपण सोयीस्करपणे दुर्लक्षित केला आणि “अनलिमिटेड ग्रोथ’च्या वल्गना सुरू केल्या. वास्तविक मानवी समाजाची “ग्रोथ’ ही केवळ आणि केवळ नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे आणि ती संसाधनेच मर्यादित असल्यामुळे “अमर्याद वाढ’ हे दिवास्वप्न आहे, असं सांगायचा प्रयत्न अनेकांनी केला; परंतु गैरसोयीच्या गोष्टी ऐकणं आपल्याला कधीच जमलं नाही आणि कधी स्पर्धेचा तर कधी अपरिहार्यतेचा हवाला देत आपण धावतच राहिलो. एके दिवशी ही धावपळ अचानक थांबली. वेग आणि वेगातलं सातत्य हाच आपल्या जीवनाचा आत्मा बनून गेला होता आणि एका छोट्याशा विषाणूने त्या वेगावरच पहिला प्रहार केला. अर्थचक्र थांबवलं. लोक बेरोजगार झाले.
उपासमारीची वेळ आली. रस्ते, रेल्वे, हॉटेल, सिनेमे, मौजमजेची केंद्रं… सगळं अचानक थांबले. ही अचानकता, अनपेक्षितता आपल्याला झेपली नाही.
करोना येऊन आता चार-पाच महिने झाले आहेत आणि आता तो “सेटल’ झालाय. त्यामुळे त्याच्या आगमनाच्या वेळी, लॉकडाऊनच्या प्रारंभी आपली मानसिकता काय होती, हे आज आपल्याला आठवत असेलच असं नाही; परंतु आपल्याला आर्थिक वाढ जरी “अनलिमिटेड’ हवी असली तरी जबाबदारी मात्र “लिमिटेड’च हवीय, हे बऱ्याच जणांना जाणवलं होतं.
करोना अचानक आला म्हणून… पण अतिवृष्टीसारखं जे संकट नियमितपणे येतंय, त्याचा आपण किती गांभीर्यानं विचार केला? आज मुंबई पुन्हा पाण्याखाली गेलीय आणि नालेसफाई वगैरे फुटकळ कारणांवरून एकमेकांवर राजकीय शरसंधान करण्यापलीकडे या संकटाचा सखोल विचार करायला आपण तयार नाही. शहरांमध्ये जागोजागी पाणी साचण्यास पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून, वळवून केलेली अतिक्रमणं जबाबदार आहेत, हे आपण अजूनही स्वीकारायला तयार नाही. निसर्गाचं चक्र बदललं त्यालाही आपणच जबाबदार आहोत, हे मान्य करायला तयार नाही.
आजही करोनाच्या तावडीतून निसटून आम्हाला पूर्वीसारखं ऊर फुटेपर्यंत धावायचंय. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात बदललेल्या निसर्गाचं मुक्तकंठानं कौतुक केल्यानंतर आता आम्हाला त्याचा कंटाळा आलाय. विकासाच्या शर्यतीत निसर्गाची गळचेपी “अपरिहार्य’ आहे, हे मनोमन मान्य करून आपण परिस्थिती “पूर्ववत’ होण्याची वाट पाहतो आहोत.
आपल्याला जी “पूर्वावस्था’ हवी आहे, ती लॉकडाऊनच्या आधीची.
संकट अचानक आलेलं असो किंवा व्यवस्थित वाजतगाजत, जाहिरात करून आलेलं असो, आपल्याला जी पूर्वस्थिती हवी असते, त्यात पैसा नावाच्या कधीच समाधान न देणाऱ्या वस्तूचा पाठलाग करण्याची खुली मुभाच केवळ अपेक्षित असते. अचानक आलेल्या संकटाविषयी आपली प्रतिक्रिया विचित्र असते; कारण आपल्याला त्याची सवयच नसते. परंतु जी संकटं नित्यनेमानं येताहेत, त्यांना तरी आपण विवेकी प्रतिक्रिया देणार आहोत की नाही?