कराड – येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईतील विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेच्यावतीने गत पंधरा दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कठड्यांना रेषा ओढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांची जागा ठराविक अंतरात मर्यादीत झाली आहे. अपुऱ्या जागेत भाजी मांडणे विक्रेत्यांना अडचणीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोणीही यावे अन् भाजी विक्री करावे, अशी स्थिती आहे. त्या पाठीमागे कारणेही तशीच आहेत. बाहेरून भाजी विक्री करण्यासाठी येणाऱ्यांना स्थानिक भाजीविक्रेते आतमध्ये बसू देत नाही. यावर वाद घालत बसण्यापेक्षा बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेरच बसून भाजी विक्री करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापासून ते बाहेर बसून भाजी विक्री करीत आहेत.
आता स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत अनेक ठिकाणांना झळाळी दिली जात असल्याने त्याअनुषंगाने पालिकेने छत्रपती शिवाजी भाजी मंडई इमारतील कठड्यांना रंगकाम केले आहे. मात्र, या रेषा ओढण्यामुळे तेथे कठड्यांवर बसणाऱ्या विक्रेत्यांना आता अपुऱ्या जागेतच भाजी विकावी लागत आहे.
कराडला शिवाजी भाजी मंडई, संभाजी भाजी मार्केट अशी दोन मोठी भाजीमंडईची ठिकाणे आहेत. तर मुख्य पोस्ट कार्यालय, गुजर हॉस्पीटल परिसरात छोटी रस्त्याकडेला भाजीविक्रेते व्यावसायासाठी बसतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अशी शिवाजी भाजी मंडई आहे. सध्या भाजी मंडई इमारत तसेच परिसरात शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांसह टेंभू, ओगलेवाडी, आगाशिवनगर, कार्वे, विंग, घारेवाडी आदी गावांतून शेतकरी येत आहेत.
सध्या हे शेतकरी भाजीमंडई परिसरासह प्रभात टॉकीज परिसर बुरूड गल्लीपर्यंत बसत आहेत. पालिकेकडून भाजी मंडईतील कठड्यांवर लाल रंगाच्या साहाय्याने रेषा ओढण्यात आल्याने तेथील कठड्यांवर बसणाऱ्या विक्रेत्यांची जागा निश्चित झाली आहे.