जयंत कुलकर्णी
नगर – नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको म्हणून गेल्या वर्षभरापासून पक्षश्रेष्ठींना सांगून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ थकले, पण त्यांच्याकडून हे पद काढून अन्य कोणीकडे देण्याचा निर्णय घेण्यास पक्षश्रेष्ठींकडून वेळकाढूपणा केले जात असल्याने मुश्रीफ देखील गेल्या काही महिन्यांपासून केवळ औपचारिकच पालकमंत्रीपद सांभाळत आहेत. परिणामी प्रशासनासह पक्ष संघटना ढेपाळली आहे.
पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला एकमुखी नेतृत्व मिळते. पण हे नेतृत्व काम करण्यास इच्छुक नसल्याने आज जिल्ह्यात एकमुखी नेतृत्वाचा अभाव भासत आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक प्रश्न भिजत पडले असून प्रशासनासह किल्लेदार आपल्या सोयीनुसार जिल्ह्याचा गाडा चालवित आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे म्हणून मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. ते पालकमंत्री झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून नवनवीन प्रकल्प जिल्ह्यात येतील, जिल्ह्यात ठोस कामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुश्रीफ वर्षभरातच जिल्ह्याला कंटाळले. अर्थात मुश्रीफ यांच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा महत्वाचा आहे. साखर कारखाना, जिल्हा बॅंक यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात त्यांना अधिक लक्ष द्यावे लागते. तसेच कोल्हापूर ते नगर हे अंतर देखील खूप लांब आहे. या प्रवासात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको असल्याचे वारंवार स्पष्ट केले. पण पक्षश्रेष्ठींना नगर जिल्ह्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसत आहे. इच्छा नसतांनाही हे पद सांभाळावे लागत असल्याने औपचारिक व वरवर प्रशासकीय कामाच्या बैठका आटोपत्या घेत आहेत.
जिल्ह्याच्या प्रशासनातील अनेक कामे ठप्प झाली आहेत. जे काही महत्वाचे असेल ते अधिकारी फोनवरून पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. मात्र, अन्य कामांना चांगलीच खिळ बसली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न “जैसे थे’ आहे. त्यांना चालना देणारेच एकमुखी नेतृत्व असूनही नसल्यासारखेच आहे. स्वतः पुढाकार घेवून विकासकामांना चालणार देणारे नेतृत्व पाहिजे. पण ते नेतृत्व असलेले पालकमंत्री नसल्याने आजही जिल्हा प्रशासनाच्या मर्जीनेच चाललला आहे. आजही अनेक समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. अनेक बैठका या सध्या फोनवर होत असून काही तर कागदोपत्री झाल्याचे प्रशासनाला दाखवावे लागत आहे. पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात किमान दरमहिन्याला बैठक अपेक्षित आहे. पण मुश्रीफ तीन ते चार महिने जिल्ह्यात फिरकत नाही.
प्रशासकीय पातळीवर आनंदी आंनदच असताना पक्ष संघटना पातळीवर काही वेगळे नाही. जिल्ह्यातील नेते व काही पदाधिकारी सोडले तर मुश्रीफ यांना अनेक तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व नेते देखील माहित नाही. सत्तेच्या माध्यमातून नेते व कार्यकर्त्यांना ताकद मिळावी. विविध विषय समित्यांवर संधी मिळावी, ही साधी इच्छा आहे. ती देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांची पूर्ण झाली नाही. आज सरकार स्थापन होवून तीन वर्ष होतील. पण या काळात संघटनेला बळ मिळत असे नेतृत्व केवळ जिल्ह्यासाठी औपचारिक ठरले आहे. सध्या तरी पालकमंत्रीपद हे असून अडचण नाही नसून खोळंबा असा चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
वळसे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक
मध्यतंरी मुश्रीफ यांनी पालकमंत्री नद नको म्हटल्याने गृहमंत्री दिलीप वळसे यांच्याकडे ही जबाबदारी टाकण्याची निश्चित झाले होते. मात्र कोठे माशी शिंकली जाणे, अजूनही त्यावर निर्णय झाला नाही. अर्थात वळसे हे पालकमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहे.
हस्तक्षेप नसल्याने नेत्यांचे फावले
मुश्रीफ पालकमंत्री असले तरी कोणत्याही तालुक्यात लक्ष घालत नाही. हे जिल्ह्यातील नेत्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळे ते आपल्या परीने तालुक्यातील विकास कामे करीत असून जिल्हा म्हणून कोणीच पाहिला तयार नाही. जो तो आपल्या तालुक्यापुरते पाहत आहे.
राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकास कामे होण्याबरोबरच पक्ष संघटनेला बळ मिळाले पाहिजे. मात्र ते होत नाही. सत्तेच्या माध्यामातून पक्ष व कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, तसेच जिल्ह्याचा नावलौकीक वाढवा. ही अपेक्षा आहे. त्यासाठी तसा पालकमंत्री हवा.
राजेंद्र फाळके,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस