कोल्हापूर – धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात. त्यामुळे त्यांना गोळी देवून झोपवले जात आहे. तसेच देशासह महाराष्ट्रातही वणवा पेटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
यासाठी शरद पवार यांना प्रत्येक मुद्यात ओढून ताणून गोवले जात आहे. कारण शरद पवार हे धर्मांध शक्तींना रोखणारे एकमेव हिमालय आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच गांधींना ज्याप्रमाणे बदनाम केले जात आहे, तसाच प्रयत्न शरद पवार यांच्या बाबतीत होत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
कोल्हापूरात येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांची शासकीय विश्रामगृहात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत गप्पाही मारल्या. आव्हाड म्हणाले, कोणी ऐकाने ठरवले म्हणून सरकार बनले नाही. हे सरकार बनवण्यासाठी शरद पवार यांचे योगदान मोठं आहे. बाकीच्यांनी मदत केली, असेही त्यांनी सांगितले.
तसेच जितेंद्र आव्हाड यांनी आर्यन खान प्रकरणावर भाष्य केले. अशा प्रकारच्या प्रकरणात लहान मुलांना अटक करताना विचार करायला हवा. या मुलांच्या बाल मनावर काय परिणाम होईल याचा विचार सर्वांनी करायला हवा. केवळ शाहरुख खानचा मुलगा हे कारवाईच कारण असू शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.