जगाने कितीही आर्थिक मजल मारली आणि शेअर बाजारांनी कितीही नवी शिखरे गाठली तरी सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंची लोकप्रियता काही केल्या कमी होत नाही. गेल्या काही महिन्यांत कमाल तापमानाप्रमाणे आणि सोने या बहुलोकप्रिय धातूच्या दरांप्रमाणेच चांदीच्या भावानेदेखील सर्वप्रकारचे विक्रम मोडले आहेत. चांदी आता प्रति किलो 92 हजार रुपयांच्या पल्याड पोहोचली आहे.
किमतीच्या पातळीवर हा भारतातील सार्वकालिक उच्चांक मानला जात आहे. विशेष म्हणजे येत्या काही काळात चांदीची चमक अशीच राहणार असल्याचे मानले जात आहे. वास्तविक चांदीने गेल्या चार दशकांत 26 पटींपेक्षा अधिक परतावा दिला आहे. उद्योग विशेषत: इलेक्ट्रिक मोटारीतील बॅटरी, सौरऊर्जेचे पॅनल आणि 5जी तंत्रज्ञानात चांदीचा वापर वाढला आहे. त्यामुळे चांदीच्या मागणीत वार्षिक 7 ते 8 टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे. मागणीत विक्रमी वाढ झाल्याने किमती देखील वाढल्या आहेत. दुसरीकडे, मागणीच्या तुलनेत चांदीचे उत्खनन स्थिर पातळीवर आहे. किंबहुना यामध्ये काहीशी घसरणही झाली आहे. 2015 मध्ये चांदीचे जागतिक उत्खनन 89.7 कोटी औस (एक औस म्हणजे 28.34 ग्रॅम) होते. 2023 मध्ये यात घसरण होऊन 82.4 कोटी औसवर आले आहे.
सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याने बहुतांश मंडळी विशेषत: मध्यमवर्गातील नागरिक दागिन्यांसाठी चांदीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळेही चांदीच्या भावाने उसळी घेतली आहे. वास्तविक गेल्या दोन दशकांत उद्योग आणि तंत्रज्ञानात चांदीची उपयुक्तता वाढली आहे. ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या अहवालानुसार गेल्या वर्षात सौर ऊर्जेसाठी वापरल्या जाणार्या ‘फोटोव्होल्टेइक पॅनल्स’मधील गुंतवणूक एक वर्षाच्या तुलनेत दुप्पट होऊन ती 80 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. फोटोव्होल्टेइक पॅनल्समध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. 2024 मध्ये चांदीच्या मागणीत 1.2 अब्ज औस वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदीच्या किमती वाढत असून लवकरच नवी उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. चांदी ही अलंकार, मूर्ती आणि भांड्यांबरोबरच औद्योगिक कारणांसाठीही वापरली जाते. औद्योगिक कारणाने एकदा चांदी वापरली की ती संपून जाते. कारण तिचे कोणत्यातरी संयुगात रूपांतर होत असते.
चांदी अत्यंत कार्यक्षम उष्णतावाहक, वीजवाहक आहे. मोबाइल फोन, वाहन उद्योग, संगणक उद्योग यांच्यासहीत असंख्य उद्योगांमध्ये चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सौर पॅनल्समध्ये चांदी वापरली जाते. जेव्हा सूर्यप्रकाश पॅनल्सवर पडतो तेव्हा सिलिकॉनचे इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि चांदी विजेला तत्काळ गती देते. आजही सिनेमाला सिल्व्हर स्क्रिन म्हटले जाते. प्रत्यक्षात प्रारंभीच्या काळात सिनेमा प्रोजेटरच्या रूपातून दाखविला जात असे. पडद्यावर चित्र आणले जाताना ते चित्र चमकदार राहणे गरजेचे असायचे. त्यामुळे रिफ्लेशन वाढल्याने चित्राची गुणवत्ता अधिक चांगली राहात असे. पडद्यावर चांगली चमक येण्यासाठी स्क्रिनला मेटॅलिक सिल्व्हरचे कोटिंग केले जायचे. तेव्हापासून हा शब्द प्रचलित झाला आणि आजही त्याचा वापर केला जातो.
चांदी सूर्यकिरणाला सर्वाधिक परावर्तित करणारा धातू मानला जातो. भारतात चांदीचा 50.7 टक्के वापर उद्योगात, 17.8 टक्के वापर दागिन्यांसाठी, 24.5 टक्के वापर नाणे, 2.8 टक्के वापर फोटोग्राफीसाठी तसेच 4.2 टक्के वापर भांड्यांसाठी केला जातो. 4 मे 1989 मध्ये अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’ने शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर मॅपिंगसाठी मॅगलेन अंतराळयान सोडले होते. चांदीत प्रकाशाच्या किरणांना परावर्तित करण्याची सर्वाधिक क्षमता असते आणि ते पाहता घातक आणि रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी यानाला सिल्व्हर कोटेड क्वार्ट्स टाइल्स बसविली होती. यानंतर सर्व अंतराळयांनाना सिल्व्हर कोटिंग केली जाऊ लागली. या आधारे यानाचे तापमान कमी ठेवण्यात मदत मिळते. जगात लहान मोठ्या अशा एकूण 757 चांदीच्या खाणी आहेत. त्यापैकी भारतात केवळ सहा आहेत.
जगभरामध्ये चांदीचा वाढत चाललेला वापर पाहता गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थकारणात अनेक नवनवी विनिमय साधने तसेच गुंतवणूक पद्धती येत असताना सोने आणि चांदी यांचे महत्त्व परस्पर संतुलनाच्या दृष्टीने वाढतच चालले आहे. दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत आणि एक किलो शुद्ध चांदीची किंमत यांचा प्रवास साधारण समांतर चालतो, असे आजवर दिसून यायचे. मात्र, सध्या चांदी बरीच पुढे गेली आहे. औद्योगिक वापरासाठी चांदीचा तुटवडा गेले दशकभर जाणवत आहे. मध्यंतरी काही काळ चांदीचा पुरवठा मागणीइतका झाला. पण 2023 मध्ये चांदीच्या जागतिक पुरवठ्यात 184 दशलक्ष औंस तुटवडा पडला. हीच स्थिती यंदाही कायम आहे. त्यामुळे चांदी येणार्या काळातही भाव खात राहणार.
सोने आणि चांदी यांच्या दागिन्यांच्या खरेदीला पारंपरिक महत्त्व आहे. विशेषतः सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही मौल्यवान धातूंकडे सर्वसामान्य नागरिक पाहात असतात. गेल्या काही महिन्यांत लोकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा अधिक फायदा सोने-चांदीच्या गुंतवणुकीतून झाला आहे. सोने व चांदी यांच्या भावांचा विचार करताना या दोन्ही धातूंमध्ये होणारी काळ्या पैशाची गुंतवणूक लक्षात घ्यावी लागते. या दोन्ही धातूंचे भाव वाढत असताना काळ्या पैशांची निर्मितीही होतच राहिली तर चढ्या किमतीलाही त्यांची खरेदी होतच राहणार आहे. त्यामुळे याबाबत शासनाचे लक्ष असायला हवे.