मांडवगण फराटा -शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेअभावी उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. भारनियमन व्यतिरिक्त सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
शिरूर तालुक्यातीच्या पूर्व भागातील इनामगाव, पिंपळसुट्टी, कोळगाव डोळस, आंधळगाव, नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, तांदळी, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला या गावांना कुरुळी, शिरसगावकाटा, मांडवगण फराटा उप केंद्रामधून वीजपुरवठा होतो. सध्या करोनामुळे घरातच बसून राहवे लागत आहे, त्यातच गरमीमुळे नागरिक हैराण झाले असताना आता वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने घरात ही बसता येत नाही अन् बाहेरही पडता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शिरूरच्या पूर्व भागात सध्या कांदा, ऊस, गहू, कडवळ, मका, भाजीपाला पिके शेतकरी घेत आहेत. भारनियमन व्यतिरिक्त सतत वीजपुरवठा खंडित होतो. विजेचा दाब हा सातत्याने कमी – अधिक होत असतो. दर पाच मिनिटांनी होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. वीज वितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करोनामुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरी रडकुंडीला आलेला असताना विजेअभावी पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे.
पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. शेतात पाणी भरण्यासाठी अनेक शेतकरी विजेकडे डोळे लावून बसलेले दिसतात. पाणी असूनदेखील डोळ्यासमोर पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. पाणी आहे तर वीज नाही अन् वीज आहे तर पाणी नाही, अशी परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे. वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.