रेडा – देशावर आलेल्या करोना व्हायरसच्या संकटावर सर्व भारतीयांनी संघटितपणे प्रयत्न करून विजय मिळवायचा आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनतेने घरोघरी रविवारी (दि. 5) रात्री नऊ वाजता वीज बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट चालू करून जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
घरामध्ये दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये थांबून व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे करोनाच्या महाभयंकर संकटाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय जनतेला शक्ती मिळून मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.
करोनाच्या संकटावर मात करण्याचे यशस्वी नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी जनतेने एकोप्याने पाठबळ द्यावयाचे आहे.