पीएमपीचे वर्षभरात 68 अपघात : तातडीच्या उपायांची गरज
पुणे – गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत पीएमपी बसेसचे 68 अपघात झाले आहेत. या वाढत्या प्रमाणांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवली जाते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. अलीकडच्या काळात पीएमपीच्या सेवेपेक्षा समस्यांचीच चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे. यात पीएमपी बसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, मोफत प्रवासी, बस थांब्याची दुरवस्था, वाढते अपघात, वेळापत्रकातील अनियमितता आदी समस्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
दरम्यान, “शहरात नागरिकांना सुरक्षित सेवा देण्याचे काम पीएमपी प्रशासन करत आहे. पीएमपीच्या संचलनात सुस्थितीत असणाऱ्या बस सोडण्यात येत आहेत. तसेच, बसच्या चालकांनाही वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात आहे,’ असे प्रशासनाने सांगितले आहे.
पाच प्रवाशांचा बळी
जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत पीएमपीच्या अपघातांत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पीएमपीच्या संचलनात आयुर्मान संपलेल्या व नादुरुस्त बसेस हाती दिल्याने अपघात होत असल्याचे चालकांनी सांगितले.