– डॉ.राजू गुरव
यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन ऑनलाइन शिक्षणाचा फंडा राबविण्यासाठी शाळांना धडपड करावी लागणार आहे. शालेय परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनेचे विशेष नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मार्चपासूनच बंद ठेवली आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर शाळांची बंद कुलपे उघडण्यात येतील. त्यावेळी शाळांसमोर असणारी आव्हाने ही नेहमीच्या आव्हानांपेक्षा वेगळी असतील. त्याचा सामना त्यांना करावाच लागणार आहे. शाळेतील वर्ग खोल्या, कार्यालये, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शिक्षक खोल्या, शाळेचे मैदान, हॉल यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे लागेल. स्वच्छता तर सतत ठेवावी लागेल. स्वच्छतागृहांसाठी तर दिवसांतून दोन-तीन वेळा जंतुनाशके टाकून स्वच्छता आवश्यक असेल.
प्रबोधनाचे नवे पर्व
शाळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी विद्यार्थी व पालकांमध्ये सकारात्मक विचार पेरून त्यांचे प्रबोधन करावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या तसेच सामाजिक स्वच्छतेसाठी दक्ष बनवावे लागेल. मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन आवश्यक असेल. शालेय प्रशासनाला समुपदेशकाची नियुक्ती करावी लागेल. प्रबोधनाच्या नव्या पर्वातून शैक्षणिक जगत आता ढवळून निघणार आहे.
तपासणी आणि नियमावली
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांची नियमित आरोग्य तपासणी अनिवार्य असेल. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सार्वजनिक स्वच्छता हे मुद्दे शिक्षण जगतात अनिवार्य असतील. बस, रिक्षा, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी कडक नियमावली वापरात आणावीच लागेल.
सत्र आणि गटनिहाय वर्ग
शिक्षण विभागाने सकाळ आणि दुपार सत्र, वर्गनिहाय दिवसाआड शाळा, पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांच्या गटांची शाळा असे पर्याय आहेत. शाळांना त्यांच्या सोयीने विद्यार्थी हिताला प्राधान्य देत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. अनावश्यक अभ्यासक्रम कमी करून पारंपरिक परीक्षा पद्धतीतही बदल करण्याचा विचार करावा लागणार आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती
डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती, ऍप, सॉफ्टवेअरची पडताळणी, विद्यार्थी-पालकांशी संवाद, विषयाच्या अनुषंगाने पॉवर पॉइंट प्रझेंटेशन, ध्वनी चित्रफीत, ध्वनिफीत तयार करावी लागणार आहेत. त्याच्या कामात सध्या शिक्षक गुंतले आहेत. यामुळे शिक्षकांचे कामकाजही वाढले आहे. याद्वारे प्रत्यक्षात शिकविणे अधिक प्रभावी ठरणार असेल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक वर्ष 15 जूनलाच सुरू करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. करोनाची परिस्थिती पाहूनच त्या त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात येतील. रेड झोनमधील शाळा लगेच सुरू करता येणार नाहीत. शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. शाळेत येता नाही आले तरी विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता यावे यासाठी काळाच्या गरजेनुसार शाळांना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावाच लागणार आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त