अहमदाबाद – गंमत म्हणून विमानात अपहरणाच्या धमकीचे पत्र ठेवणाऱ्या व्यावसायिकाला अहमदाबादच्या विशेष एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
देशात विमान अपहरण विरोधी कायद्यांतर्गत झालेली ही पहिली शिक्षा आहे. 2017 साली बिरजू किशोर साल्लाने मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात अपहरणाची चिठ्ठी ठेवली होती. विमानात अपहरणकर्ते आणि स्फोटके असल्याचे त्याने पत्रात लिहिले होते. बिरजूने पद्धतशीरपणे हा कट रचला होता. त्याने कसे धमकीचे पत्र बनवले ते सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. 23 जानेवारीला त्याच्या विरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रात या सर्व गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या.
पाच कोटींच्या दंडाच्या रकमेपैकी वैमानिक आणि सहवैमानिकाला प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे निर्देश त्याला कोर्टाने दिले आहेत. चिठ्ठी सापडल्यानंतर 30 ऑक्टोबर 2017 रोजी अहमदाबाद विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले होते. धमकीचे पत्र सापडले त्यावेळी विमानात 115 प्रवासी आणि सात क्रू मेंबर होते.