सगळ्यात सोपी, न शिकताही सहज येणारी कला म्हणजे नाव ठेवणे. आपल्या आजूबाजूला अनेक जण याबाबतीत अगदी डॉक्टरेट द्यावी इतक्या तयारीची आहेत. कुणी काहीही करू देत न करू देत यांचा उद्योग ठरलेला… नावं ठेवणं.
सध्याच्या परिस्थितीत जो तो घरात अडकलाय. तरीही आता आपल्याच होम स्विट होममध्ये घुसमटायला होतंय, हे खरं. काहींची मुलं लहान आहेत काहींची शिकायला बाहेर असणारी मुलं घरी आलीयेत. हसत-खेळत वेळ सुसह्य करणं चाललंय. घरकामातून वेळ काढून ती मुलांसाठी काही पदार्थ करतीय. मीडिया उपलब्ध आहे म्हणून त्यांचे फोटो पोस्ट करतीय; कारण ती अजूनही सोशल आहे. लॉकडाऊनमध्ये असूनही माणसांपासून दुरावलेली नाहीये. कुणी गाणी गाताहेत कुणाचं कविता वाचन चालू आहे; कुणी पुन्हा नव्याने हातात ब्रश पकडून पेंटिंग करतंय. ज्याला जसं जमेल तसं स्वत:चं नी इतरांचं मनोरंजन करतोय. अनेकांना स्मार्ट फोनचे बरेच फंक्शन आत्ता कळताहेत.
पण या जमातीला त्याचंही वावडं लगेच सरसाऊन नावे ठेवायला तयार. “गाणं गाता येत नाही’, “तयारी नाही’, आजकाल प्रत्येकजण स्वत:ला अमुक समजतो नी तमुक समजतो. मुळात इथे त्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे यांना कळत नसेल का? कितीही तयारी केली तरी तो तोच राहणार आहे. कुणाशी बरोबरी करण्याचा प्रश्नच नाहीये.
प्रत्येकाला आपापला एक वेगळा रंग, ढंग आहे. मोठ्या नामवंत गायकांनी गायलं म्हणून बाकीच्यांनी गायचंच नाही का? आयुष्यभर तेच करायचं ठरवून एखादा प्रख्यात चित्रकार, वादक होतो म्हणून बाकीच्यांनी त्या गोष्टी करायच्याच नाहीत का?
प्रथितयश कलाकारांनी त्यांचा काळ गाजवला. त्यांनाही या “नाव ठेवणं” दिव्यातून जावं लागलंय. अनेकांना मनात असूनही ती गोष्ट शिकता आली नाही, त्यात करियर करता आलं नाही, म्हणून आतली असलेली आवड, हौस मारायची का? बाकीचे अतिउत्तम गातात म्हणून मी गुणगुणायचंही नाही का? मानवी मनाची फार सहजसुलभ उर्मी आहे ती. बाळाला अंगाई गाणारी आई कुठे सारेगम शिकलेली असते? अंगणात रांगोळी काढणारी सुहासिनी चित्रकला कुठे शिकते? शेतात एका रेषेत शेत नांगरणारा शेतकरी कुठे ड्रॉईंग शिकलेले असतात? ही अभिव्यक्ती खूप आतून येते, तिचा संबंध अंत:करणाशी असतो; प्राविण्याशी नाही.
भव्य डेरेदार झाडाकडे बघून वैषम्य वाटून नुकत्याच उमलणाऱ्या रोपट्याने उमलूच नये का? जगरहाटीचा नियम आहे बदल. बदलाशिवाय प्रगती नाही. “जुनं ते सोनं’ हे तत्त्व मान्यचं आहे; पण किती कवटाळून बसणार? अशाने नवनिर्मिती होणारच नाही. त्यातही प्रत्येक वेळेस अतीतयारीचा अतिप्रगल्भतेचा अट्टाहास का? एखादा “कच्चा पण सच्चा’ आवाजही कानाला गोड वाटतोच की. सतत मेकअप केलेल्या चकचकीत चेहऱ्यापेक्षा एखादी नितळ निर्लेप षोडशाही आवडून जाते.
तुम्हाला एखाद्यात चूक दिसत असेल तर नक्की दाखवा; पण नुसतीच दाखवू नका, तर तुमच्यात ती योग्यता असेल, तर सुधारा-शिकवा त्याला. हे होतं का? तर नाही. पण नाव ठेवणं हे जन्मजात घेतलेलं व्रत मात्र मुक्त मुखे अखंड विनामूल्य सुरूच असतं. आज नशीबाने नेट, मीडिया आहे, म्हणून गोष्टींची ऑनस्क्रिन देवाणघेवाण तरी करता येत आहे. घरात राहूनही एकमेकांशी जोडून ठेवणं आहे. लाईव्ह येणं त्याचाच एक प्रकार. त्यालाही नावं ठेवणं काही संपत नाही.
शेवटी समाज आहे फार उलटं वाहता येणार नाही, हेही लक्षात असू द्या. कुणी केलेल्या पदार्थांचे फोटो टाकले; ठेवा नावं. “देशात गरिबी आहे लोकांना अन्न मिळत नाहीये खायला!’ कुणी नवीन ड्रेसमध्ये फोटो टाकले, “अरे लोकांना कपडे नाहीत घालायला,’ उगाच “या सगळ्याला मी तर कारणीभूत नाही ना’, अशी शंका येतीय मनात अशाने. समाजात हा असमतोल कायमस्वरूपी होता राहील… जो तो आपापल्या कर्मानुसार झगडतोय, जगतोय. यात कुठेही कुणी असंवेदनशील, वास्तवाचं भान नसलेले असे उद्गार काढू नयेत.
आजकाल समाज खूप बदललाय. हजारो उदाहरणं आहेत तो क्षणात डोक्यावर चढवतो ही नी उतरवतोही. खूप जणांना हे आवडणारंच नाही. तरीही शांततेत याचा विचार नक्की करा. लोक आपापल्या परीने वेळ काढताहेत उभारी देता येत नसेल तर त्यांचा विरस तरी करू नका. बघा पटतंय का?
– केतकी बाळकृष्ण देशपांडे