धोकादायक वस्त्यांचे सर्वेक्षण लांबणीवर
चार भिंती रस्त्याला अतिपावसाने दरड कोसळून एका महिलेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. साताऱ्यातील माची पेठ, चार भिंती व बोगदा परिसरातील धोकादायक वस्त्यांची पाहणी करण्याची घोषणा उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली होती. मात्र, बांधकाम विभागाचे कामकाज अद्याप सुरळीत न झाल्याने धोकादायक वस्त्यांची पाहणी मात्र कागदावरच राहिली आहे. दरवर्षीप्रमाणे सातारा शहरातील धोकादायक 36 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सातारा – सातारा शहरात पावसाने सरासरी गाठली असून मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात रस्ते विकास अनुदानाचे तीन कोटी रुपये खड्ड्यात गेले असून ना पाणी, ना वीज आणि वरून पावसाचा मार अशा अवस्थेत सातारकर आठवडाभरापासून वैतागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणी करणारी कासची जलवाहिनी बंद राहिल्याने घंटेवारी कोलमडली. ऐन पावसाळ्यात चिपळूणकर बाग ते बोगदा परिसरातील वस्त्यांना कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा फटका बसला. शहापूर पाणी पुरवठा योजनेवर ताण वाढल्याने खाणीच्या टाकीपासून ते गणेश टाकीपर्यंतचे घंटेवारीचे वेगळे नियोजन करावे लागले.
शहराचे कारभारी वैष्णोदेवीच्या दौऱ्यावर
जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर असताना सातारा विकास आघाडीचे काही पदाधिकारी व मुख्याधिकारी शंकर गोरे उत्तर भारताच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती असून तिकडेही पावसाचा वाढता जोर भूस्खलनाच्या घटनांमुळे पालिकेचे कारभारी तिकडेच अडकून पडले आहेत. “हाय अलर्ट’च्या वेळी मुख्यालयात थांबणे अपेक्षित असताना मुख्याधिकाऱ्यांची वर्षा सहल मात्र सातारकरांसाठी चर्चेचा विषय ठरला असून जिल्हा प्रशासनाकडून ही सुट्टी मंजूर कशी झाली, असा प्रश्नही विचारला जात आहे.
शहरभर खड्डेच खड्डे
सर्किट हाऊसच्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची पाहणी केल्याचा फार्स केल्यानंतर पदाधिकारी पुन्हा पालिकेत निवांत झाले. राजवाडा ते देवी चौक, चांदणी चौक ते गोल मारुती, ट्रान्सपोर्ट ऑफिस कॉर्नर, शाहू चौक, गुरुवार परज ते ढोर गल्ली, राधिका थिएटर ते कर्मवीर कॉलनी, भोसले मळा (करंजे तर्फ सातारा) ते बसस्थानक, हुतात्मा उद्यान चौक, पारंगे चौक, सदर बझार कॅंप, गोडोली कॉर्नर व सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर अर्धा ते दीड फुटाच्या खड्ड्यांनी सातारकरांच्या मणक्यातीत गॅप वाढवला आहे. मुरूमांचे पॅचिंग बांधकाम विभागाने गुंडाळल्याने बांधकाम विभागाचे हसे झाले आहे.