पालिकेचा टॅंकर आला की उरुळी देवाची परिसरात नागरिकांची झुंबड
– महादेव जाधव
फुरसुंगी – करोनामुळे शहर तसेच उपनगरांतील कंपन्या, हॉटेल्स बंद आहेत. यामुळे पाण्याचा वापर कमी झाला आहे त्यातही खडकवासला धरणात मुबलक पाणी असताना उपनगरांत पिण्याच्या पाण्याची टॅंकरची संख्या कमी असल्याने सोशल डिस्टन्सिंग सारखे नियम मोडून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. हवेली तालुक्यातील उरुळी देवाची येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई तर जीवावर उठली असून टॅंकर आला की नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे.
खडकवासला धरणांत पाणीसाठा असतानाही एप्रिल महिन्यातच या परिसरातील नागरिकांना पाणीटं चाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांची संख्या मोठी असल्याने टॅंकर कमी पडत आहेत. महानगरपालिकेने अधिक टॅंकर पाठवावेत, अशी मागणी केली जात असली तरी पालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या टॅंकरवरील कर्मचाऱ्यांकडूनच सोशल डिस्टन्सिंग ठेवून पाणी देण्याची व्यवस्था करणे अपेक्षित असताना चालक फक्त टॅंकर आणून उभा करतात यातून टॅंकरवर चढून त्यामध्ये पाइप टाकण्याची स्पर्धाच लागते. करोनामुळे काळजी घेण्याचे कोणी सांगायला गेले तर भांडणे होत आहेत. त्यामुळे हंडाभर पाणी कसे मिळेल, याकरिताच सर्वांची धडपड सुरू असल्याचे पहायला मिळते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित उरुळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. टॅंकर भोवती पाण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
पाणी मिळविण्यासाठी महिला-पुरुषांसह आबालवृद्धही टॅंकरवर भोवती गर्दी करीत आहेत. मास्क न लावताच अनेकांकडून पाण्यासाठी टॅंकरला गराडा घातला जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असताना यातून करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही ऐसीतैसी झाल्याची स्थिती येथे निर्माण झाली आहे. यातून करोना प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपोमुळे या परिसरातील जलस्रोत दूषित झाले झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही येथील नागरिकांना मूभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रस्ते, मलवाहिनी, जलवाहिनी यासारखी कामेही अद्याप झालेली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कचरा डेपोतील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळेही नागरिक त्रस्त आहेत.
कचरा डेपोमुळे जलस्रोत दूषित…
करोना असो किंवा स्वाइन फ्लू असो… आमची लढाई पाण्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरातील भूगर्भातील जलस्रोत दूषित झाले आहेत. बोअरवेल आणि विहिरीमध्ये क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही. कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरता येत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे वर्षभर पाण्यासाठी झगडावे लागत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी मांडली.
पाणी टंचाईतून बाधित वाढणार?
हडपसर तसेच मुंढवा परिसरात 26 रुग्ण करोनाबाधित असल्याची नोंद आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात अद्याप रुग्ण सापडलेला नाही. अशा स्थितीत येथील नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे; परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे. त्यातही टॅंकर आला तरी गर्दी होत असल्याने यातून करोना बाधितांची संख्या वाढण्याचा मोठा धोका आहे.