डोंबारी समाजाची उदरनिर्वाहासाठी जीवघेणी कसरत
ना शिक्षण…ना पुढील जीवनाची दिशा…
तुटपुंज्या उत्पन्नातून उदरनिर्वाह
प्रा. नीलेश जगताप
सासवड – आजच्या वैज्ञानिक युगामध्ये विविध तंत्रज्ञान विकसित होत असताना. प्रत्येकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी धडपडत आहे. समाजातील अनेक भटक्या विमुक्त जाती जमातीमधील हजारो कुटुंबीयांना पोटाची खळगी भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
शासकीय योजनांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे समाजातील वंचित घटकांना योग्य तो न्याय मिळत नाही. समाजातील अशीच एक भटकंती करणारी जमात म्हणून डोंबारी समाज ओळखला जातो. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास हे डोंबारी करतात. गावोगावी फिरून दोन बाबूंच्या आधारे दोरी बांधून त्यावरती संगीताच्या तालावर हातात बांबू घेऊन तोल संभाळून कसरती करत त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह करतात.
आजच्या बदलत्या आधुनिक युगात डोंबाऱ्याच्या खेळातही काही बदल घडत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी ना शिक्षण…ना पुढील जीवनाची कोणतीही दिशा… त्यामुळे संगणकीय युगातही या कलावंतांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. एका पाच ते सहा वर्षांच्या मुलीला दोरीवर चालवून संसाराचा तोल सांभाळावा लागत आहे. हे विशेष. सध्याच्या युगातही डोंबारी समाजाचे आयुष्यही त्या दोरीवरच्या मुलीसारखे अधांतरीच आहे.
ग्रामीण भागातील गावामध्ये साप घेऊन भटकंती करणारे गारुडी, जादूचे प्रयोगही दाखवणारेही काळाच्या ओघात लोप पावत आहेत. असे विविध प्रयोग सुरू झाले तर छोटी-छोटी मुलेच नाही, तर मोठी माणसेही हे खेळ बघण्यासाठी उत्सुक असत. दोन बांबू रोवून त्याला मधोमध दोरी बांधून त्या दोरीवर चालत एक पाच वर्षांची मुलगी आपला स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा तोल सांभाळत आहे.
डिजिटल जमान्यातही चिमुकला जीव टांगणीला
मेक इन इंडिया, डिजिटल इंडियाचे गोडवे गाणारी शासकीय यंत्रणा या वंचितांना न्याय देणार तरी कधी? असा सवाल उभा राहतो. आज सरकार सांगतेय की भारतीयांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला असुन प्रत्येक घरात मोबाईल, टिव्ही आला आहे. पण इथे तर चित्र अतिशय भयानक दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवर चिमुकल्या जीवाला आपला इवलासा जीव टांगणीला लावावा लागतो आहे. ज्या आईने नऊ महिने पोटाचा गोळा सांभाळला व जीवापाड जपलेल्या आपल्या लेकीला दोरीवर चालवताना किती यातना होत असतील याचा विचार देखील करवत नाही.