नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना विमा कवचाची गरज आहे. ही बाब ध्यानात घेऊन ज्या पॉलिसीधारकांच्या पॉलिसी हप्ता न दिल्यामुळे लॅप्स झाल्या असतील अशा पॉलिसीधारकांना संबंधित पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्याची मुभा लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशने दिली आहे.
एलआयसीने सुरू केलेली योजना 10 ऑगस्टपासून चालू झाली असून ते 9 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. कोणत्या पॉलिसीधारकांना पॉलिसी पुन्हा सुरू करता येईल, या संदर्भातील माहिती कार्यालयात उपलब्ध करण्यात आली असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.
योजनेनुसार काही पॉलिसी धारकांनी प्रिमीयमचा हप्ता न दिलेल्या महिन्यापासून पाच वर्षाच्या आत ही पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची शक्यता खुली होईल. या कालावधीत लागणाऱ्या विलंब शुल्कावर 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. परिस्थितिजन्य कारणामुळे या पॉलिसीधारकांना हप्ता वेळेवर भरत आला नाही अशा पॉलिसीधारकांना आपली पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची संधी यामुळे मिळणार आहे.