नवी दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचा आयपीओ एप्रिल पूर्वी येण्यासाठी सरकार कडून जो गृहपाठ अपेक्षित आहे, तो होताना दिसत नाही. त्यामुळे एप्रिल पूर्वी एलआयसीचा आयपीओ निघण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र या वृत्तात कसलेही तथ्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एलआयसीचा आयपीओ सध्याचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे 31 मार्चपूर्वी निश्चित बाजारात येईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
काही वृत्त माध्यमातील वृत्ताचा इन्कार करताना निर्गुंतवणूक सचिव तूहीकांत पांडे यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये पांडे म्हणतात की, आयपीओ संदर्भातील सर्व बाबी वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्यात येत असून जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये एलआयसीचा आयपीओ निश्चितपणे शेअर बाजारात येईल.
आयपीओ आल्यानंतर एलआयसीचे बाजार मूल्य तब्बल आठ ते दहा लाख कोटी रुपये होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने जुलै महिन्यातील बैठकीत एलआयसीच्या आरयपीओला परवानगी दिली आहे.
त्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून एलआयसी आणि इतर विभाग हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
एलआयसी पॉलीसीधारकांना या आयपीओत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करीत असून पॉलीसीधारकांनी आपला पॅन क्रमांक संलग्न करावा त्याचबरोबर डिमॅट खाते उघडावे अशी सूचना एलआयसीने गेल्या आठवड्यातच आपल्या पॉलिसी धारकांना केली आहे. हा आयपीओ भारतातील सर्वात मोठा समजला जातो. सरकारने निगुंतवणूकीतून जी रक्कम उभा करायची ठरविली आहे. त्यामध्ये एलआयसीच्या आपीओचा सर्वात मोठा वाटा असणार असल्याचे समजले जाते