- अभ्यासक, संशोधक, वाचकांमध्ये नाराजी
- ग्रंथालयेदेखील सुरू करण्याची सातत्याने मागणी
पुणे – राज्यात बुधवारी अनलॉक 5 ची घोषणा झाली. विविध आस्थापना 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली. मात्र, अद्याप ग्रंथालयांबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ग्रंथालयेदेखील सुरू करण्याची मागणी होत आहे.
करोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बंद असणारे व्यवहार जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहेत. तर बुधवारी जाहीर केलेल्या अनलॉक 5 मध्ये ग्रंथालये सुरू करण्याबाबत आदेश दिला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील ग्रंथालये त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रंथालये सुरू होण्याबाबत वाचकांकडून सातत्याने विचारणा होत असून, यामुळे अभ्यासक, संशोधक, वाचक आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याचा फटका ग्रंथविक्रीला बसला आहे. प्रकाशक, वितरक, विक्रेते आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
संकटकाळात निराशेचे मळभ दूर करण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकातच आहे. पुस्तके ही जीवनावश्यकच आहेत. परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनलॉक 5 मध्ये राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार झालेला नाही, ही गंभीर बाब आहे. मानवी जीवनातील ग्रंथांचे स्थान लक्षात घेत आणि साहित्य व्यवहाराला उभारी देण्यासाठी ग्रंथालये सुरू होणे आवश्यक असल्याचे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.