भाषाप्रभू, शब्दप्रभू, ज्ञानपीठ पारितोषिक सन्मानित कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर या साहित्यसूर्याचा जन्मदिवस. मराठीमायेच्या या लेकराच्या थोर कामगिरीमुळे आज दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. माझी मराठी भाषा. आपली मराठी भाषा. जन्मापासून कानांवर पडलेल्या अवीट गोडीच्या मराठी शब्दांबरोबर अनुभवलेलं बालपण, तारुण्य, आणि मराठीच्या खाचाखोचांनी, तिच्या लडिवाळ आंदोलनांनी, तिच्या लचक्या-मुरक्यांनी व तिच्यातल्या मनस्वी रांगडेपणाने समृद्ध झालेलं जीवन.
स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेकांनी इंग्रजांविरुद्ध लेखणी परजली. अशी ही तुमची, माझी, आपणा सर्वांची मायमराठी हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली. पुढेही हजारो वर्षे राहील, अशी ताकद असणारी. मात्र, इंग्रज आले. तेव्हा आपल्याला नवनवीन ज्ञानभांडार खुले होईल. म्हणून इंग्रजी घरात आली. पाहुणी म्हणून आली. नकळत घराची मालकीण झाली.
“मराठी भाषा जगणार की मरणार?, असा प्रश्न सतत का उभा राहतो? भाषा ही आपली आई असते. आपण जगात आल्यावर पहिला शब्द उच्चारतो “आई!’ आपण मराठीला म्हणूनच “माय मराठी’ म्हणतो.
आपली भाषा ही फक्त भाषा नसते, ती एक संस्कृती असते. संस्कृती ही आपल्या जीवनाची धारणा, जीवनपद्धती असते. एखाद्या प्रदेशाची भाषा नष्ट झाली तर तिथली संस्कृतीही नष्ट होते. प्रत्येकाला आईचे मोठेपण ठाऊक असते. त्यामुळे कठीण परिस्थितीतही सगळे आपल्या आईला जगवण्याचा प्रयत्न करतात. जगातल्या जवळजवळ सर्व देशांमध्ये महाराष्ट्रीय मंडळ आहे. तिथे मराठी माणसे आपली भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
बेळगावच्या मराठी माणसांना बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करावेसे का वाटते? कारण तो त्यांच्या अस्तित्वाचाच लढा बनला आहे. आपण आपल्याच देशात, राज्यात आपल्या भाषेची हेटाळणी करतो. आज अनेक अभ्यासात अवघड इंग्रजी, ग्रीक, लॅटिन शब्द आपण सहज शिकतो. पण आपल्यालाच मराठी असण्याबद्दल, भाषेबद्दल विनाकारण न्यूनगंड आहे. परवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे काही उमेदवारांना नोकरी नाकारली.
किती हे मानसिक दारिद्रय आणि किती ही इंग्रजीची गुलामी? गावाकडे मराठी शाळांमधून विद्यार्थी पुढे अनेक मोठ्या पदांवर विराजमान झालेले देशाने पाहिले आहेत. अनेक उद्योजक निर्माण झाले आहेत. पण लक्षात कोण घेतो? आपल्या खेड्यापाड्यांतून मराठी तिच्या विविध रूपातून अजून टिकून आहे. आपणही मराठी भाषेवर प्रेम करू या.