मुंबई – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष न्यायालयासोबतच निवडणूक आयोगासमोर देखील सुरु आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्हही गटाला नवीन चिन्ह आणि नाव देण्यास सांगितले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आता ठाकरे गटाने टीका करत एक पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. यात शिंदे गटाला मदत केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे.
या पत्रातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाने सवाल उपस्थित केले आहेत. नाव आणि पक्षचिन्ह देताना झुकते माप दिल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने पत्राद्वारे केला आहे. या पत्रात ऐकून १२ मुद्दे मांडण्यात आल्याचे समजते. यात निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याचे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
ठाकरे गटाचे सवाल
आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केली आहे.
दोन्हही गटाने चिन्हाचे आणि पक्षाच्या नावाचे पर्याय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्हासह शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले होते. चिन्ह बाद झाल्यामुळे शिंदे गटाला पुन्हा पर्यायी चिन्ह द्यावे लागले होते त्यात शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत ठाकरे गटाने काही सवाल उपस्थित करणारे पत्र आयोगाला लिहिले आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.