मुंबई – भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावून त्यांचा अवमान केल्याची भावना पक्षाच्याच केडर मध्ये पसरली असून या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांना जाहीर पत्र पाठवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालतानाच त्यांच्या नेतृत्व शैलीचेही तोंडभर कौतुक केले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच परताल असे वाटले होते पण ते व्हायचे नव्हते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या आधीही पाच वर्ष काम केलेत आताही हे सरकार आणण्यासाठी तुम्ही अपार कष्ट सोसलेत. इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका दूर सारून पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्षाचा आदेश हा कोणत्याही आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही दाखवून दिलेत. पक्षाचा आदेश म्हणजे काय असतं हा वस्तुपाठच तुम्ही दाखवून दिला आहे असेही राज ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ही बढती आहे की अवनती आहे यात मी जात नाही आणि अन्यही कुणी जाऊ नये. धनुष्यातून भविष्याचा वेध घ्यायचा तर दोरी थोडी मागे ओढावीच लागते.या मागे ओढलेल्या दोरीला कोणी माघार म्हणत नाहीत, तुम्हाला यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे असेही राज ठाकरे यांनी नमूद करून फडणवीस यांच्या विषयी या पत्रात पुर्ण सहानुभूती व्यक्त केली आहे.
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यात शिवसेनेला यश मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील मविआ सरकार कोसळलं. त्या दिवसापासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्यात सर्वत्र होती. फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असंचं चित्र सर्वासमोर होतं. मात्र, सरकार स्थापनेच्या दाव्यानंतर चित्र पालटलं.
फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. परंतु आपण मंत्रिमंडळात नसेल, असे सांगत फडणवीस यांनी धक्का दिला होता, मात्र हे सरकार चालेल ही माझी जबाबदारी असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. मात्र, अवघ्या दोन तासांत केंद्रीय पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनदा फोन केला. नरेंद्र मोदींच्या आग्रहानंतर फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.