अरूणा सरनाईक
म्हातारपण हे दुसरे बालपण असते असे म्हणतात. पण मूळ बालपण आणि उतारवयात आलेले बालपण यांच्यामध्ये फरक असतो. तो लक्षात न आल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक कुटुंबासाठी ओझे ठरतात. ते कमी करण्यासाठी म्हातारपणावर खरंच काही बोलण्याची गरज आहे. स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळणाऱ्या मुलांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. वृद्धांना आश्रय देणाऱ्या व त्यांची देखभाल करणाऱ्या पाल्यांना आयकरात सूट देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. यासंबंधी प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
एकंदर परिस्थती पाहता “म्हातारपणावर बोलू काही’ हाही विषय ऐरणीचा ठरू पाहतोय. याकडे समाजाचे लक्ष वेधणे गरजेचे होत चाललंय. आज घरटी कमीतकमी एक ज्येष्ठ आहेच पण ते फक्त वयाने आहेत. लहानपण पुन्हा माघारी येते तेव्हा त्याला म्हातारपण असे म्हणतात अशी व्याख्या आपण म्हातारपणाची करू शकतो; पण ते बालपणासारखे असते, बालपण नसते.
पण आजकाल जशी नात्यात आपण गफलत करतो, जसं सून ही मुलीसारखी, जाऊ ही बहिणीसारखी, नवरा हा मित्रासारखा इ. त्यामुळे होते काय की जे जसे आहे ते तसे राहत नाही. काही काळ आयुष्याचा हा सारखेपणा शोधण्यात जातो. मग होते पंचाईत. कोणतेच नाते आहे तसे राहत नाही आणि मग त्याचा होणारा भार सोसवत नाही. मग ते ओझे बनते. तसेच जे वय शरीराची जी नैसर्गिक अवस्था देवाने दिलेली आहे ती त्या त्या वेळी भोगून एन्जॉय करून घ्यावी. आठवणीच्या रूपाने ती आपल्या जवळ ठेवावी. पुन्हा ती वेळ ती अवस्था का बरे जगण्याची इच्छा आपल्याला होते? म्हातारपण जणू दुसरे बालपण असे म्हणायला खरंच सोपे आहे. पण वास्तवात तसे जगताना, जगणाऱ्याला आणि सोबत राहणाऱ्याला किती कठीण असते! शारीरिक अर्थाने ते लहानपण नसते. कारण त्या शरीराने जीवनाची सारी रूपे, सारे भोग भोगलेले असतात. पण तृप्तता अभावाने असते. अजून हवंची आस तीव्र असते. जीवनातून सुटलेले काही धरू पाहण्याची असोशी असते. त्यापाठी वागण्यात विमनस्कता असते. प्रसंगी आग्रहीपणा हा हट्टीपणाकडे झुकून त्याचे रूपांतर तर्कटीपणात होते. मी, माझे मला अशी “म’ ची बाराखडी, क, ख, ग अशा प्रचलित बाराखडी ऐवजी सुरू झालेली आढळून येऊ लागते.
आज खरंच उमलत्या पिढीचे आयुष्य फार जास्त ताणाचे आणि समस्यांनी भरलेले आहे. त्यात विचारांची जनरेशन गॅप, राहणीमान याचा मेळ बसणे खरंच ताणदायक आहे. काही आपण केलेले संस्कार यामध्ये त्यांची कुतरओढ होत असते. माझा मुलगा लग्नानंतर बदलला हा विचार एकदा का मनात रूजला की, मग सगळ्याच नात्याची वाट लागते. आपल्या वाढत्या वयाबरोबर त्यांचेही वय आणि जबाबदाऱ्या वाढत्या असतात. अशावेळी ज्येष्ठांकडे नकळत होणारे दुर्लक्ष ते सहन करू शकत नाहीत. मग होतो वागण्यातला हट्टीपणा सुरू. इथे लहान मूल बऱ्याचवेळा असे वागते तर त्याला प्रसंगी दोन धपाटे घालून चूप करता येते. काही काळाने ते सर्व विसरून आईला बिलगते. पण म्हातारपण असे वागू देईल का? कारण तेवढी निरागसता त्या वाढत्या वयात राहत नाही.
आज आजूबाजूला अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांच्या अशा वागण्याने घरं दुभंगलीत, नाती दुभंगलीत तरी जगणे मात्र सुरू आहे. वयानुसार आजारपण येणार, जवळ कोणी नसणार ही परिस्थिती दिवसागणिक वाढते आहे. एक प्रसंग सांगते. मुले परदेशी असल्याने ते दोघेच राहतात. काही कारणाने एकत्र जमलो होतो. गप्पा सुरू होत्या. विषय नेहमीप्रमाणे भरकटत मुलांवर येऊन पोहोचला. बाई तावात येऊन बोलल्या, आमची तर अशी इच्छा आहे की, शेवटपर्यंत मुलांची मदत नको. आपले आपणच करावे. यावर मुलांचे उत्तर फार विचार करायला लावणारे होते. तो म्हणाला, “अग, घाटावर पण आधीच जाऊन राहा. म्हणजे माझा पुढचा साराच त्रास वाचेल.’ घरी काहीतरी झाले असावे त्यावरची त्याची ही प्रतिक्रिया अतिशय तीव्र आणि हतबलतेतून आली होती. क्षणभर सारेच सुन्न झाले.
म्हातारपण ही जीवनाची संध्याकाळ तर लहानपण ही जीवनाची सुंदर शुभ्र पहाट आहे. बाह्य देखावा बऱ्याच अंशी सारखा असतो. वातावरण आल्हादकारक असते. निसर्ग सुंदर असतो. त्याची सुंदरता बघण्यासाठी मुबलक वेळ असतो. काळजी घेणारे असतात. आजकाल सोयी देखील उपलब्ध असतात. पण मानसिक आणि शारीरिक अवस्था पूर्णत: भिन्न असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण, कसा घेतो ते त्याच्यावर अवलंबून असते. लहानपण हे आयुष्याचे पहिले पाऊल तर म्हातारपण आयुष्य चालून आलेल्या गंतंव्याचा थांबा असतो. गाठीशी भल्या-बुऱ्या अनुभवांची पोतडी असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरलेला असतो आणि तो बदलविण्याचा लवचिकपणा वयानुसार जुना झालेला असतो. याउलट बालपण असते. या वयात नवीन प्रत्येक गोष्ट शिकण्याचा उत्साह दांडगा असतो.
नावीन्याचे अपार कौतुक असते आणि ते शिकत असताना, किंवा शिकल्यावर मोठ्यांकडून कौतुक करून घेण्याची प्रबळ इच्छा असते आणि आपणही मुलांनी नवीन काही शिकल्यावर त्यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना प्रोत्साहित करतो. मोठ्यांनी केलेल्या कामाची पावती त्याचे अनुभवी वय किती आहे यावर अवलंबून असते. त्यांनाही कौतुकाची थाप निश्चितच आवडते आणि हवी असते हेही तितकंच खरं आहे. पण ती मिळाल्यावर त्याचा मोबदलाही वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतो. त्यात काय येवढे हे असे करण्यात तर आमचे अख्खे आयुष्य गेले किंवा आम्ही आयुष्यात हेच तर करत आलो त्यात वेगळे ते काय? अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर समोरच्याचा त्यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न सपशेल फसतो.
जीवनाविषयी सकारात्मक भावना वयानुसार कमी होऊ लागते आणि बालपणात ती वाढू लागते. म्हणूनच आपल्याकडे आयुष्याची विभागणी चार्तुवर्णानुसार केलेली आहे, जे चार आश्रम पूर्वसुरींनी सांगितलेले आहेत त्यांचे पालन आजही काटेकोरपणे केले गेले तर सर्वांचेच आयुष्य सुखासमाधानाचे जाईल. वृद्धाश्रमाची गरज न राहता तो जीवनाच्या शेवटच्या प्रवासाचा सुंदर थांबा राहील. वृद्धाश्रम न राहता वानप्रस्थाश्रम राहील. ईशचिंतनातून आयुष्यभराच्या सुखदु:खाचा योग्य प्रकारे नैसर्गिक वाहता प्रवाह होऊन प्रभूचरणी पोहोचताना मनात लपून बसलेले लहान मूल पुन्हा जागे होऊन देवाचे जग पुन्हा किलकिल्या नजरेने अप्रुपतेचे वरदान घेऊन नव्या उमेदीने निरखेल. शरीर जीर्ण होईल; पण मन निरागसतेने ओथंबलेले असेल आणि तेव्हाच प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा फक्त कवीचा न राहता आपला सर्वांचा होईल.