मुंबई : परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करा. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, देशभरात आज सर्वत्र होळी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून 15 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत असेल. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत, अशी सूचना दिली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत. या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धुलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी होळी आणि धुलिवंदन साजरा करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.