पुणे – जिल्हा तसेच तालुका फेररचना अथवा विभाजानाचे निकष निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा तसेच तालुकानिर्मिती ही मोठी प्रशासकीय प्रक्रिया असून खर्चिक बाब आहे. त्यानुसार विविध पैलू तपासून मंत्रिमंडळाच्या मान्यतेने धोरण निश्चित करू. त्यानंतर नवीन जिल्हा तसेच तालुका निर्मितीसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे संकल्पित असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
“जिल्हे व तालुक्यांची फेररचना करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत सात आमदारांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना थोरात बोलत होते.
सध्याचे जिल्हे तसेच तालुक्यांचे विभाजन करण्यासाठी शासनाकडे लोकप्रतिनिधी तसेच विविध माध्यमांद्वारे मागण्या प्राप्त झाल्या आहेत. यासाठी 2014 मध्ये अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
तसेच विभाजनाबाबतचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या दोन्ही समित्यांनी अहवाल शासनास सादर केला आहे,’ अशी माहिती थोरात यांनी दिली.