मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील ४० गावांवर दावा केल्यानंतर राजकीय वातावरणं ढवळून निघाले आहे. बोम्मई यांच्या वक्तव्याचा राज्यातील सर्वच स्तरांतुन जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईमध्ये बोम्मई यांच्या पोस्टरवर काळी शाई फासण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कर्नाटक नव्याने पाहुया’ या आशयाच्या कर्नाटक सरकारच्या जाहिरातीच्या पोस्टरवर अज्ञातांनी शाई फासली आहे.
दरम्यान, तिकडे बसवराज बोम्मईंविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून नुकतंच तीव्र आंदोलन करण्यात आले. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी काढून शिवसैनिकांनी बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. कर्नाटकच्या काही बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहूनदेखील राज्यात आंदोलन करण्यात आले.
बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटमधील ४० गावांवर कर्नाटक राज्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राची अवहेलना होत आहे”, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. तर कर्नाटकातील भाजपा सरकारचा हा आगाऊपणा खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर महाराष्ट्र-सोलापूर सीमाप्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “बोम्मई किंवा अन्य कोणीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नसून आम्ही न्यायालयात लढू आणि महाराष्ट्राची गावे परत मिळवू. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.