मुंबई : राज्यातील काँग्रेसचे नेते आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात मात्र सोनिया गांधी यादेखील सामनाची दखल घेतात, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांना उत्तर दिले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर शंका उपस्थित केली होती. दरम्यान, आता नाना पटोले यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका करत इशारा दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या सामनामध्ये नेमके काय लिहिले आहे हे बघून सामनाचा सामना कसा करायचा हे योग्य वेळी ठरवू असा इशाराच पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी भाजपच्या नेत्यांवर देखील टीका केली. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि आशिष शेलार हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर वारंवार टीका करतात. काँग्रेसने हा देश निर्माण केला आहे पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः चे घर बांधण्यात व्यस्त असल्याचा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला. लोकांना वाचवण्या ऐवजी लोकांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचेही त्यांनी म्हटले. मराठा आरक्षण प्रश्नी बोलताना त्यांनी म्हटले, या मुद्द्यावर पक्ष नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र सध्या लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, यापूर्वी देखील नाना पाटोळे पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर शंका उपस्थित केली होती. यावर त्यांनी आम्ही सामना वाचत नाही आणि संजय राऊत यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे म्हटले होते.