नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर हे ज्ञान, उपक्रम, नावीन्य आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून उदयास यावे. या उपायांमुळे जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनावे, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संबोधित करत होते.
जम्मू-काश्मीर हे अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि नावीन्यपूर्ण मुलांचे भांडार आहे. शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांची प्रज्वलित मने तयार होतील, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विषद करताना राष्ट्रपती म्हणाले.
आपली परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा केवळ आपल्या मातृभाषेतून समजून घेणे आवश्यक आहे. मातृभाषेतूनच आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेचे पालन करत नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरणात ज्या त्रि- भाषेची कल्पना केली आहे त्यास फार महत्त्व आहे. यामुळे बहुभाषिकता तसेच राष्ट्रीय ऐक्य वाढते, पण त्याच वेळी कोणत्याही राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही.
या धोरणात शिक्षणातील सुलभता, समानता, सुलभता, उत्तरदायीत्व निश्चित करणे आणि कौशल्य विकास, अनुभवावर आधारित शिक्षण आणि तार्किक विचारांना प्रोत्साहित करणे यावर भर देण्यात आला आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींनी या धोरणाची उद्दीष्टे आणि शांततामय व समृद्ध भविष्य साध्य करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना शुभेच्छा दिल्या.