श्रीगोंदा -कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या संचालक मंडळाने नेहमीच सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक आणि काटकसरीचा कारभार केला आहे. कारखान्याची “एफआरपी’ची रक्कम प्रतिटन 2 हजार 160 असून, शेतकऱ्यांना प्रतिटन 2 हजार 250 रुपयांनी पैसे वर्ग केले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता आणि कामगारांना बोनस देऊन दिवाळी गोड करू, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली.
आज (दि. 28) पिंपळगाव पिसा येथे कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. या वेळी जगताप म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक सगळ्यांच्या सहकार्यामुळेच बिनविरोध करणे शक्य झाले. कुकडी साखर कारखाना सांडपाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलणार आहे.
शेतकी विभागाबाबत तक्रार आल्या आहेत. भविष्यात तक्रारी आल्यास चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. कारखाना कार्यस्थळावर लमान बाबांच्या डोंगरावर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल जगताप यांनी दिली.
साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार म्हणाले की, ऊस लागवडीची नोंद घेऊन ऊसतोडणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. यातच कारखान्याचा फायदा आहे. काही कर्मचारी हे आपणच मालक आहोत, असे वागतात. त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर पंदरकर म्हणाले की, कामगार व इतरांची देणी 92 कोटींवर गेली आहेत. समारंभ खर्च करोनात वाढला आहे. संचालक मंडळाने अनाठायी खर्च टाळला पाहिजे. ऊसउत्पादकांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या वेळी सुरेश लोखंडे, भास्कर कदम, विश्वास थोरात, ऍड. बाळासाहेब पवार, दादा भापकर, सोमनाथ खेडेकर, गणेश बेरड, भाऊ कदम आदींनी सूचना मांडल्या. या वेळी संजय आनंदकर, शरद गलांडे धोंडिबा लगड, अंकुश रोडे, नितीन डुबल, संजय नलगे, श्रीपाद कवाष्टे आदी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांनी अहवालवाचन केले.