दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला साखळीतच बाद व्हावे लागले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कर्णधार विराट कोहली भावुक बनला होता. यंदाच्या स्पर्धेत अपयश आले असले तरी येत्या काळात दमदार पुनरागमन करु, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला.
यंदाच्या स्पर्धेत आम्ही खूप मेहनत घेत होतो पण तरीही यश मिळाले नाही. अशा मोठ्या स्पर्धेत अपयशी ठरल्यावर खेळाडूही निराश झाले आहेत. मात्र, या मानसिकतेतून लवकरच बाहेर येऊ व पुन्हा एकदा जागतिक वर्चस्व सिद्ध करु, असेही कोहलीने सांगितले.
कर्णधारपद सोडले असले तरीही एक खेळाडू म्हणून मी कायमच नव्या कर्णधाराच्या पाठीशी उभा राहिन. बीसीसीआय, खेळाडू, संघ व्यवस्थापन व चाहते यांनी सातत्याने दिलेल्या पाठींब्यामुळेच आम्ही अनेक मालिकांमध्ये यशस्वी ठरलो.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये यश आले नाही हे मान्य परंतू येत्या काळात ही कसरही भरून काढू, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.