नवी दिल्ली – भारत सरकारच्या मालकीची (पब्लिक सेक्टर अंडरटेकींग-पीएसयु) एअर इंडिया ही आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि सामान वाहतूक कंपनी सध्या विकण्याच्या प्रक्रियेपर्यंत येऊन ठेपली आहे. एकेकाळी देशातल्या एका खासगी उद्योजकानेच सुरु केलेल्या या कंपनीला पुन्हा एकदा खासगीकरणाचे वेध लागले आहेत. कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे कारण सरकारकडून दिले जात आहे. मात्र, अद्याप या कंपनीच्या खरेदीसाठी कोणीही पुढे आलेले नाही.
वर्ष 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारत सरकारकडे स्वत:ची कोणतीही विमान वाहतूक कंपनी नव्हती. टाटा सन्स ने वर्ष 1932 मध्ये “एअर इंडिया’ची स्थापन केली; त्यावेळी त्या कंपनीचे नाव होते “टाटा एअर लाईन’. वर्ष 1946 मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि तिचे नाव “एअर इंडिया’ असे झाले. जेआरडी टाटा हे भारताचे सर्वात पहिले परवानाधारक व्यावसायिक पायलट होते. त्यांनी तो परवाना वर्ष 1929 मध्येच मिळवला होता.
एअर इंडियाचे पहिले विमानही त्यांनीच स्वतः कराची ते मुंबई दरम्यान चालवले होते. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटांनी एक टपालविमान कराचीहून अहमदाबादमार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर स्वत: चालवत आणले. टाटा एअरलाइन्सकडे सुरूवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरूवातीच्या काळात कराची ते मद्रास दरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. भारतीय स्वातंत्र्यानंतर वर्ष 1948 मध्ये त्यांनी “इंडियन एअर लाईन’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी स्थापन केली.
वर्ष 1953 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्त्वातील भारत सरकारने या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. पण त्यावेळीही या कंपनीच्या अध्यक्षपदी जेआरडी टाटा यांनाच कायम ठेवण्यात आले होते. वर्ष 1978 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी टाटा यांना अध्यक्षपदावरुन दूर केले होते. सातत्याने नफ्यात चालणारी ही कंपनी वाढती खासगी विमानकंपन्यांची स्पर्धा आणि शासकीय कारभार यामुळे तोट्यात आली असून हा तोटा हजारो कोटी रुपयांचा आहे.
एके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाचा विमान वाहतुकीमध्ये 60 टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खासगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. वर्ष 2011 मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. त्याच वर्षी “इंडियन एरलाइन्स’ला “एअर इंडिया’मध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या “एअर इंडिया’च्या तोट्यामध्ये लक्षणिय वाढ होत गेली.