ना. चंद्रकांत पाटलांना केले लक्ष्य दुष्काळाच्या प्रश्नावरून शरद पवारांचा अल्टिमेटम
म्हसवड – राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. यावर उपाययोजना करण्यास सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले तर, सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा बंदोबस्त करू, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला. 1972 च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ रोजगार, पाणी यांचे गांभीर्य वाढवणारा आहे. या दुष्काळांच्या उपाययोजनांसदर्भात राज्यशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, त्याचे राजकारण करू नये आणि जे करतात, अशा छोट्या माणसांकडे मी लक्ष देत नाही असा टोला पवारांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
बारामती ऍग्रोतर्फे माण तालुक्यातील टंचाई ग्रस्त भागाला 30 टॅंकरचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पवार म्हसवड येथे आयोजित संवाद मेळाव्यात बोलत होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुष्काळी दौऱ्यात भालवडी, शिंदी खुर्द, वावरहिरे या गावांचा खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा केला. दरम्यान, त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
खासदार शरद पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यासह महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्रच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्वसामान्य नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. गत वर्षी पाऊस कमी पडला याही वर्षी पाऊस कमी पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या वर्षी दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. मात्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देताना कुठेही दिसून येत नाही. आमच्या काळात माण तालुक्यात दुष्काळग्रस्त दौऱ्याच्या वेळी आम्ही गोळी पेंड चारा छावण्यांमध्ये पुरवली होती.
चारा छावण्यांमधील जनावरांच्या दुधामध्ये चांगली वाढ झाली होती. या दूध वाढीचा शेतकऱ्यांना चांगला फायदाही झाला होता. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी नक्कीच आम्ही सातत्य ठेवत असतो ही वेळ राजकारण करण्याची नाही.शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. या विभागातील परिस्थिती व शेतकऱ्यांचं दुःख सरकार समोर मांडेन त्यानंतरही सरकारला जर जाग आली नाही तर सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू, असा इशाराही पवार यांनी माण तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.
यावेळी या दुष्काळी दौऱ्यात माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, युवानेते रोहितदादा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संजिवराजे निंबाळकर, डॉ. संदिप पोळ, जि. प. सदस्या सोनाली पोळ , जि. प. सदस्या भारती पोळ, माजी सभापती वसंतराव जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी जि. प. अध्यक्ष सुभाष नरळे, युवा नेते युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, दुष्काळी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी माण-खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधुन नागरिकांना व जनावरांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोतर्फे 50 टॅंकर दिले असुन गेल्या दुष्काळात पवार साहेबांनी जशी मदत या भागाला केली होती त्याच पध्दतीने याही वर्षी त्यांनी ज्यादा पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी बोलताना युवानेते रोहित पवार म्हणाले आदरणीय पवार साहेबांनी मला माण खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला काय करता येईल का? यावर आम्ही बारामती अैग्रो तर्फे सद्या 30 टॅंकर दिले असून आणखी टॅंकर उपलब्ध करून देणार आहोत.