टाळ-मृदंगाच्या तालावर दिंड्यांची अलंकापुरीकडे वाटचाल
पारगाव शिंगवे (वार्ताहर) – सकाळच्या वेळी पडणारी सूर्यकिरणे अन् धुक्याची नवलाई… हिरवीगार शिवारे अशा वातावरणात पायी दिंड्या टाळमृदंगाच्या तालावर सुंदर अभंगांनी व ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने अवघा परिसर भक्ती रसात न्हाऊन निघत आहे.
चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ।।
तीर्थयात्रे सुखे जाऊ ।
वाचे विठ्ठलाचे नाव घेऊ ।।
संता संगे सेऊ ।
वासुदेव धनिवरी ।।
संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून जाणाऱ्या दिंड्या आळंदी मार्गस्थ होत असून वारकरी मंडळीचे गावोगावी स्वागत करून नागरिकांकडून त्यांना चहा, नाष्टा दिला जात आहे. यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील पिके अतिवृष्टीने शेतजमिनीत सडून गेली. तसेच जनावरांचा हिरवा चारा व तरकारी पिके वाया जाऊ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सरकाराकडून अद्याप कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे वारकरी सांप्रदायांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओढे नाले भरभरून वाहत आहेत.
पाणीसाठाही मुबलक असल्याने शेतीची कामे उरकून नाशिक, नगर, पुणे, जिल्ह्यातील पायी दिंड्या पारगाव शिंगवे तसेच पाबळ मार्गाने आळंदीकडे मार्गस्थ होत आहे. यामुळे हा परिसर भक्तीमय झाला आहे. वारकरी अनेक ठिकाणी मुक्काम करून रात्र भजन कीर्तनात रंगून जात आहेत. ऊन व थंडीची तमा न बाळगता वारकऱ्यांना आस लागते ती ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाची माऊलींच्या दर्शनाने जीवन सार्थक होत असल्याने मनामध्ये असलेले दुःख, चिंता, संसाराचा विसर पडून ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करून अनेक गावच्या पायी दिंड्या आळंदी मार्गस्थ होत आहे.
पायी दिंड्यांना पोलीस संरक्षण मिळावे
दिवे घाटात जेसीबी पालखी सोहळ्यामध्ये घुसल्याने अपघात होऊन संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज सोपान महाराज नामदास व दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 15 वारकरी जखमी झाले होते. याबद्दल वारकरी सांप्रदायाकडून दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत असून आळंदीकडे मार्गस्थ होत असलेल्या पायी दिंड्यांना पोलिसांकडून संरक्षण मिळावे अशी मागणी वारकरी सांप्रदायांकडून करण्यात येत आहे.