जगदीश देशमुख
आपल्या देशात शिक्षण प्रणाली योग्य की अयोग्य, शिक्षण शिकून काय फायदा असे अनेक विषय चर्वण करून चोथा झाले आहेत. तरीही शिक्षण प्रणालीवर योग्य उत्तर सापडतच नाहीये. चला आज या विषयावर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू या.
आपल्याकडे आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये चार प्रवाह ठळकपणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्रजांनी स्वत: शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करून पाश्चात्य पद्धतीचे मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर आधारलेले शिक्षण सुरू केले. ही पद्धत पूर्णत: पुस्तकी शिक्षणावर आधारित होती.
दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे भारतीय लोकांनी निर्माण केलेल्या संस्था. इंग्रजांच्या संस्थांना पर्याय उपलब्ध व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन होईल अशा पद्धतीने शिक्षण द्यावे, तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण पोहोचून विकास व्हावा, या हेतूंनी आपल्याकडच्या काही समाजधुरिणांनी शाळा-महाविद्यालये स्थापन केली.
तिसरा मोठा प्रवाह निर्माण केला तो महात्मा फुले यांनी. पुढे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार केला. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी न राहता जनसामान्यांपर्यंत ते पोहोचले पाहिजे, हा विचार या तिसऱ्या प्रवाहामध्ये होता. अर्थात या दोन्ही प्रवाहांचा गाभा पाश्चात्य शिक्षण हाच होता.
चौथा प्रवाह होता तो मूलभूत शिक्षणाचा. गांधीजी या प्रवाहाचे प्रणेते होते. शिक्षणाचा आणि राष्ट्रीय विकासाच्या चळवळीचा परस्परसंबंध असायला हवा, हा गांधीजींचा विचार यामागे होता. शिक्षणाचा प्रत्यक्ष कामाशी आणि तंत्रज्ञानाशी सांधा असायला हवा, या भूमिकेतून गांधीजींनी याला “नई तालीम’ असे म्हटले होते. पाश्चात्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीला खऱ्या अर्थाने पर्याय देणारा हा नवा ढाचा होता. मात्र, हा प्रवाह फारसा वाढला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही या प्रवाहाला फारसे बळ मिळाले नाही.
या चारीही शिक्षण प्रणाली ह्या त्या त्या काळाची गरज होती. आजच्या शिक्षण प्रणालीचा गाभा भलेही पैसा हा असेल तरी बाकी घटकांचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांना समोर ठेवून आजच्या शिक्षणाची रचना करावी लागेल, तसा अभ्यासक्रम आखावा लागेल. शिक्षणाला आध्यात्माची साथसंगत हवी हे अधोरेखित झाले आहे. केवळ विज्ञान शिक्षणामुळे वैज्ञानिक-अंधश्रद्धा वाढते. त्यामुळे माणूस भौतिक सुखाच्या व चैनीच्या मागे लागतो. त्याला आपल्याच देशातील पूर्वापार परंपरा, चालीरिती यांविषयी घृणा वाटू लागते. म्हणून विद्यार्थ्याला त्याच्या परिसराशी जोडून ठेवणाऱ्या, सामाजिक बांधिलकीचे भाव जपणाऱ्या शिक्षणाची गरज आहे.
शिक्षण असे हवे ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्कारांबरोबरच श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास व आत्मगौरव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या वैभवशाली व कर्तृत्ववान इतिहासाची माहिती पाठ्यपुस्तकांद्वारे देणे गरजेचे आहे. या दृष्टीने शिक्षणाचे भारतीयीकरण झाले पाहिजे. शैक्षणिक नीती व तंत्रज्ञानात भारतीय ज्ञान-विज्ञान यांची उपलब्धता व प्रोत्साहन हवे. म्हणून भारतीय सांस्कृतिक वारशाचे अध्ययन पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट व्हावे. भारतीय समाजाच्या विकासाची व उन्नतीची आस धरणाऱ्या शिक्षणाने भारतीय भाषांची कदर केली पाहिजे. इंग्रजी बरोबरीनेच स्थानिक भाषांचे परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेने शक्य असल्यास एक बाग, वनराई, शेत स्वतः विकसित करावे किंवा कृषी- वन इत्यादी खात्यांच्या संयोगाने प्रयोगतत्त्वावर चालविण्यास द्यावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या कष्टांतून फळे-फुले-भाज्या यांच्या बागा फुलवाव्यात किंवा वर्षाला एक पीक घ्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातीत काम करण्याची सवय उत्पन्न होईल व श्रमप्रतिष्ठा रुजेल. क्रीडांगणावर, मैदानावर नियमितपणे खेळ, व्यायाम इत्यादी उपक्रमांत सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे.
आठवड्यातील किमान दोन तास याकरिता वेळापत्रकात राखून ठेवावेत. शारीरिक कष्टांची कामे केल्यानंतर शक्यतो बौद्धिकदृष्ट्या जड विषयांचे तास न ठेवता हस्तकाम, हस्तकला, बैठे-खेळ (बुद्धिबळ, इतर पारंपरिक खेळ) यांचे तास असावेत. आठवड्यातून किमान एकदा अनाथालये, वृद्धाश्रम, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी भेटी देऊन रुग्ण व अपंगांच्या व गरिबांच्या सेवेची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न करावी. शाळेतील सभागृहात, मोकळ्या मैदानावर योगासने, श्लोक, प्रार्थना इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार करावेत. यासाठी आठवड्यातील किमान तीन तास, एक तास शक्य झाल्यास औपचारिक शिक्षणास सुरुवात करण्यापूर्वी सकाळी आरक्षित करावेत.
तुकड्या-तुकड्यांनी विद्यार्थ्यांना बस-स्टॅंड, रेल्वे-स्टेशन, पोस्ट ऑफिस, बॅंका, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणचा व्यवहार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा. त्यात बाजारहाट, हिशेब ठेवणे, काटकसर व बचत कार्यक्रमातील सत्रे, सूत्रसंचालन, प्रास्ताविके, विषय-मांडणी, वक्ता-परिचय, आभार-प्रदर्शन इत्यादींचा समावेश असावा. अभिनय, चित्रकला, रंगकाम, मूर्तिकला, संगीत, वक्तृत्व इत्यादी अनेक कलांचे प्रदर्शन घडवावे.
या युगाला ज्ञानयुग म्हणून ओळखतात. किमान दहा हजार वर्षांची वैभवशाली ज्ञानपरंपरा असलेल्या भारताने आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या बरोबरीनेच आपली बौद्धिक क्षमताही जगाला दाखवून दिलेली आहे. म्हणून ज्ञान-विज्ञानावर आधारित एका नव्या विश्वकल्याणकारी संस्कृतीची देणगी जगाला देण्याची तयारी भारताने दाखविली पाहिजे. त्यासाठी आपल्या शिक्षणाची पुनर्रचना करून हे आव्हान स्वीकारण्यास आपण सज्ज झाले पाहिजे.
आपल्या देशात कुठलाही विषय हा राजकारणाचा स्पर्श झाल्याशिवाय संपताच कामा नये असा अलिखित नियम असावा असे वाटते. अशा स्थितीत शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल करणे फार गरजेचे आहे. अभ्यासक्रम असा हवा की त्यातून प्रत्येक विद्यार्थाचा सर्वांगीण विकास होईल, शिवाय प्रत्येक विद्यार्थाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल.