नगर -नगर शहराचे लाडके आमदार म्हणून लौकिक असलेले अनिलभैय्या राठोड हे जनसामान्यांचे नेते होते. अल्पसंख्याक समाजाचे असतानांही त्यांनी शहराचे नेतृत्व केले. भाजपाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
भाजपातील अनेक नेत्यांशी त्यांचे तात्विक वाद होत असत, मात्र प्रत्तेक निवडणुकीत भाजपच्या सर्व नेत्यांनी अनिलभैय्यांचेच काम केले. भविष्यात भाजपाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते अनिलभैय्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केले.
शहर भाजपच्या वतीने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सुनील रामदासी, सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, नरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक रवींद्र बारस्कर, तुषार पोटे, महेश तवले, सचिन पारखी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले, “”अनिलभैय्यांकडे कोणताही साखर कारखाना नाही, शैक्षणिक संस्था नव्हती, तरी ते लोकनेते होते. सर्वसामान्यांसाठी ते सतत धाऊन जात होते. मोबाईल आमदार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पासून शिकवण घेत पुढे काम करू.”
वसंत लोढा, सुनील रामदासी यांनीही भावना व्यक्त केल्या. वसंत राठोड, अमित गटणे, मनोज ताठे, संतोष गांधी, भरत सुरतवाला, बाबा खान आदि उपस्थित होते.