जयंत पाटील ःविरोधी पक्ष दर्जेदार असावा
मुंबई : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे. हे अधिवेशन संविधानानुसार होत नाहीये, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षाने त्यांचा मान राखणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. तसेच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजाराला वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसेच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
मंत्र्यांनी घटनेनुसार शपथ न घेतल्याचा आरोप करणाऱ्या फडणवीसांवर जयंत पाटलांसह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनी देखील उत्तर दिले. पाटील म्हणाले की, मंत्र्यांनी शपथ घेताना जे हातात होते तेच वाचले. एखादे चांगले काम करत असताना मोठे व्यक्ती किंवा महापुरुषांचा उल्लेख कुणी केला विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतले, शाहू महाराज, आंबेडकर ,महात्मा फुले नाव घेतले तर राग का आला? असा सवाल त्यांनी केला. पिढ्यान पिढ्या ह्यांच्या मनात असूया आहे. विरोधी पक्ष दर्जेदार असावे, असेही पाटील म्हणाले.
यावेळी भुजबळ म्हणाले, राज्यपालांची शपथ जशीच्या तशी वाचली. तसेच शपथ घेताना संसदेत पण जय श्रीराम आणि अशा घोषणा केल्या जातात. मग संसद रद्द करावी लागेल. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. ते म्हणाले होते मजबूत विरोधी पक्ष हवे आम्ही त्यांना दिला आहे, असे भुजबळ म्हणाले.
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विरोधी पक्षाने मुख्यमंत्री अभिनंदन करायला पाहिजे होते. प्रचाराच्या काळात फडणवीस म्हणायचे मला विरोधी पक्ष नेता दिसत नाही. त्यावेळी मी तेव्हा म्हटले होते तुम्ही आरशात उभे राहा दिसेल, असा टोलाही त्यांनी लगाविला.