खासदार जमयांग नामग्याल यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे -“काश्मीर राज्यापासून वेगळे होण्याची लडाखची 70 वर्षांची मागणी सत्यात उतरली आहे. राज्याचा दर्जा जाऊन केंद्रशासीत प्रदेश होणार, म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही. बदलानंतर आपल्या हाती काय उरेल किंवा विकास कशा पद्धतीने होणार ही लोकांची काळजी स्वाभाविक आहे. मात्र, लडाखचे सौंदर्य हरवू न देता त्याचा विकास करू आणि हे आपलेच सरकार आहे, हे लोकांना पटवून देऊ,’ असे मत लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाने जम्मू-काश्मीर राज्यात कलम 370 आणि 35 “अ’ रद्द केल्यानंतर आणि जम्मू- काश्मीर आणि लडाख या राज्यांना केंद्र शासीत राज्यांचा दर्जा दिल्यानंतर संसदेतील आपल्या भाषणाने नामग्याल यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. लडाखचा तरूण खासदार म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले जाते. नामग्याल हे बुधवारी पहिल्यांदाच पुणे भेटीवर आले होते.
या दरम्यान त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचे केंद्र लडाखमध्ये सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नामग्याल आणि डॉ. करमळकर यांच्यात चर्चा झाली. त्यात, “लडाखमधील उष्ण पाण्याच्या झऱ्यांपासून ऊर्जानिर्मिती, औषधी वनस्पती, पर्यावरण आणि हवामानबदल, पर्यटन आणि बुद्धिस्ट भाषा या 4 विषयांमध्ये स्थानिकांना सोबत घेऊन संशोधन करता येईल,’ असा प्रस्ताव नामग्याल यांनी मांडल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले. तसेच, कोथरूड भागाला भेट दिली. बालगंधर्व येथील कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
“लडाखमध्ये संधी निर्माण करण्यासाठी अनेकजण पुढे’
नामग्याल म्हणाले, “आतापर्यंत मेडिकल, इंजिनिअरिंग, आयआयटी, आयआयएम अशी कोणतीच शैक्षणिक संस्था लडाखमध्ये स्थापन झाली नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बाहेरच जावे लागते. आठवी-दहावीपर्यंत कसेही उत्तीर्ण केले जाते. शिक्षणासाठी किंवा चांगल्या नोकरीसाठी प्रत्येकाला बाहेर जाता येतेच असे नाही. इतकेच नव्हे तर आमच्याकडे कोणताही प्रकल्प कार्यान्वित होऊ दिला नाही. हे चित्र आता बदलायचे आहे. लडाखमध्ये संधी निर्माण करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण हे न बिघडता आम्हाला विकास साधायचा आहे.’